टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि.२२ नोव्हेंबर २०२२ : नगर दौंड महामार्गावर विसापूर फाटा जवळ हॉटेल फौजीच्या समोर दौंडवरुन नगरला जाणाऱ्या इंडिका कारने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा नादात समोरून येणाऱ्या दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यामध्ये दोन जण ठार झाले असून दोघे जखमी अवस्थेत आहेत.
याबाबत संपूर्ण हकीकत अशी की, सकाळी १०: ३५ मिनिटांनी नगरहून सौ कुलकर्णी सरिता व सचिन काळे हे मोटरसायकल क्रमांक एम एच १६ ए क्यू ८९८० वरून हॉस्पिटलच्या कामानिमित्ताने श्रीगोंदा कडे जात असताना दौंडच्या बाजूने विसापूर फाट्यानजीक हॉटेल फौजी समोर एक ट्रक चालला होता. त्यास इंडिका गाडी क्रमांक एम एच २० बी वाय ५२५४ वेगाने ओव्हरटेक करीत असताना समोरून आलेल्या कुलकर्णी व काळे यांच्या दुचाकीस जोराने उजव्या बाजूने धडक दिली. त्यामध्ये दोघांचे पाय जागेवरच तुटले. त्यांच्या मागे कोरेगाव, ता. श्रीगोंदा येथील साबळे व कवडे हे दुचाकीवरून जात असताना इंडिका गाडी आपल्या अंगावर येत आहे हे पाहून त्यांनीही आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तरीही इंडिका गाडीने त्यांनाही जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जीव वाचला परंतु पोपट साबळे यांचा डावा पाय मोडला व कमरेमध्ये मोठ्या प्रमाणात सूज असल्याचे समजते. त्यांच्यासमवेत असणारे सुरेश कवडे यांच्याही पायाला प्लास्टर करण्यात आले आहे. हे दोघेही सध्या नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रस्त्यावर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.
- नगर दौंड महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. सातत्याने या रस्त्यावर अपघात घडत आहेत. भरधाव वेगाने जाणारी वाहने, ओव्हरटेक करताना होणारा निष्काळजीपणा, वेगावर नियंत्रण नसणे, दुचाकी वाहनचालक पांढऱ्या पट्ट्याच्या आत गाडी चालवत नसल्याने, मोठ्या वजनाच्या गाड्या सुसाट वेगाने चालविणे, खडी, वाळू वाहतूक करणारे डंपर, तरकारी वाहून नेणाऱ्या गाड्या व ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर यांच्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र या महामार्गावर वारंवार पहावयास मिळत आहे.
जाणारे येणारे जखमींना मदत करण्यास थांबत नव्हते. त्याचवेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार हे तेथून जात असताना तेथे थांबले, त्यांनी कोळगाव चे सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड व चिखलीचे केशव झेंडे ,तसेच इतर नागरिकांच्या मदतीने जखमींना बाजूला केले व पोलीस स्टेशन, ॲम्बुलन्स यांना तातडीने फोन केले. कोळगाव व बेलवंडी येथील ॲम्बुलन्स तेथे पोहोचताच त्यामध्ये जखमींना नागरिकांनी उचलून ठेवले. रुग्णवाहिका ने प्रथम नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना घेऊन गेले. परंतु तेथे डॉक्टरांनी कुलकर्णी सरिता व सचिन काळे यांना मृत घोषित केले. इतर जखमींवर नगर येथील खाजगी रुग्णालयात इलाज चालू आहे. सदर घटनेचा दुपारी एक वाजेपर्यंत पंचनामा झाला नव्हता. व तेथे कोणीही सरकारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हते. दुपारी दीड वाजता बेलवंडी पोलीस स्टेशनचे नंदकुमार पठारे व पोलीस कॉन्स्टेबल भांडवलकर ही घटनास्थळी रवाना झाली असून सदर घटनेचा पंचनामा करीत असल्याचे समजते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : महेशकुमार शिंदे)