टीम लोकक्रांती
कोळगाव प्रतिनिधी | दि.१० फेब्रुवारी २०२३ : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध व न्याय हक्काच्या मागण्यासंदर्भात सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे .या मोर्चात राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख अमोद नलगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे महामंडळाच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथे शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय असा महाअक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
अशी माहिती अहमदनगर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर तोरमल, सरकार्यवाह भानुदास दळवी, प्रसिद्ध प्रमुख अमोल नलगे यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी असणार आहेत त्या दृष्टीने या मोर्चाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या..
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा वीस तीसच्या लाभाची योजना राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीस त्वरित परवानगी देण्यात यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अनुकंपा नियुक्ती वरील शिक्षकेतर मान्यता तात्काळ देण्यात याव्यात, चतुर्थी सेनेतील कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीची त्रुटी तात्काळ दुरुस्त करावेत, विनाअनुदानित वरून अनुदानित पदावर केलेल्या बदलीस मान्यता देण्यात यावी, न्यायालयीन निर्णयानुसार राज्यातील सर्व पदवीधारक ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, सरेंडर रजेचा लाभ पूर्वीप्रमाणे देण्यात यावा, अर्जित रजा कालमर्यादा वाढवावी, विधानपरिषद निवडणुकीमध्ये मताचा अधिकार असावा, चतुर्थ श्रेणी सेवकांचे कामाचे स्वरूप निश्चित करावे, मुलींच्या शाळेत महिला सेविका देण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी महा आक्रोशमोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
विविध प्रश्नांचे निवेदन यावेळी शासनास देण्यात येणार असून या मोर्चाची दखल न घेतल्यास फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, जिल्हाध्यक्ष भीमाशंकर तोरमल, सरकार्यवाह भानुदास दळवी, कार्याध्यक्ष बालाजी नवले, ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब थोटे, उपाध्यक्ष पद्माकर गोसावी, निवृत्ती लोखंडे, जयराम पांडे, किशोर मुथा ,विजय हराळे, महेंद्र बोरुडे, नाना डोंगरे, शिरीष राऊत, सविता शिंदे इत्यादींनी केले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन