टीम लोकक्रांती
श्रीगोंदा शहर | दि.२० फेब्रुवारी २०२३ : श्रीगोंदा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कामांची व गलथान कारभाराची चौकशी करण्यात यावी.जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यात अनेक गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून काही गावांमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठ्याचे काम झाले व ती योजना अद्याप सुरू नाही.तरी जुन्या योजना पूर्ण होईपर्यंत नवीन कामांना सुरुवात करू नये.तसेच गाय गोठा प्रकरणात लोकांची अडवणूक व पिळवणूक होत आहे ती थांबवावी.तसेच अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे कामे करत आहेत या कामांची तपासणी करूनच बिले अदा करावीत.या व इतर काही मागण्यांसाठी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवार दि.२० फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलत असताना राजेंद्र म्हस्के म्हणाले की,सध्या प्रशासकीय कारभार चालू आहे.त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात अंधाधुंदी कारभार चालू आहे.बांधकाम विभागात बोगस एबी रेकॉर्ड करून बिले अदा केली जात आहेत.ठेकेदार व संबंधित शाखा अधिकारी संगणमताने निधी लुटण्याचे काम करत आहेत.गाय-गोठा प्रकरणे जाणीवपूर्वक आर्थिक लाभासाठी अडवले जात आहेत.पंचायत समिती निगडित कामांसाठी लोकांना एका कामासाठी दहाबारा हेलपाटे मारावे लागतात.प्रशाकीय कारभारामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालू आहे.जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत असे त्यांनी सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ बोलत असताना म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे कोणत्याच कामाला दर्जा राहिला नाही.दलित वस्तीसाठी आलेला निधी दलित वस्तीत खर्च होत नाही.पंचायत समिती मधील अधिकारी प्रत्येक कामात आर्थिक तडजोड करताना दिसत आहेत.हे कुठं तरी थांबलं पाहिजे असे ते म्हणाले.
- “जलजीवन मिशन” योजना हि “पैसे कमाव मिशन” योजना..!!
– राजेंद्र म्हस्के(मा.पं.समिती सदस्य)
तालुक्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे. परंतु पूर्वीच कोट्यावधी रूपये खर्च करून केलेली योजना सुरळीत चालू नाही.लोकांना त्याचा लाभ मिळत नाही.वेळेवर पाणी मिळत नाही म्हणून लोक पाणीपट्टी भरत नाहीत.मग आता येणारी वाढीव पाणी पट्टी कशी भरतील.हे सर्व सामान्य कुटुंबासाठी शक्य नाही.हि योजना केवळ ठेकेदार व अधिकारी यांच्या फायद्याची आहे.असे म्हस्के म्हणाले.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राम जगताप यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. गटविकास अधिकारी बोलत असताना म्हणाले की, आंदोलनातील प्रमुख मागण्या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकी घेतली आहे.ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत व गैरव्यवहार झाला असेल त्या ठिकाणी चौकशी करू व कारवाई करू असे लेखी आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी अनिलराव ठवाळ, राम घोडके, शिवप्रसाद उबाळे, दत्तात्रय दांगडे, प्रमोद म्हस्के, महादेव म्हस्के, मनोज शिंदे,माऊली मोटे, अजिनाथ कळमकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन