टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२३ मार्च २०२३ :
मागील अनेक वर्षांपासून श्रीगोंदा शहरात व तालुक्यात दूध भेसळ सुरू असून अन्न व औषध प्रशासन यांकडे तक्रार करूनही अधिकारी आर्थिक तडजोडी करून,कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे कठोर कारवाई करणे संदर्भात आज दि.२३ मार्च रोजी श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी अनेक मागण्या या निमित्ताने मांडल्या
श्रीगोंदा तालुक्यातील बाळासाहेब बाबुराव पाचपुते,रा-संतवाडी काष्टी रोड वांगदरी याला दुधात केमिकल भेसळ करताना रंगेहात पकडले त्याच बरोबर त्याला केमिकल पुरवठा करणारा संदीप मखरे (रा-मखरेवाडी ता श्रीगोंदा) याला सुद्धा पोलिसांनी पकडले आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा शहरातील जवळपास चार इतर आरोपी सुद्धा अटकेत आहेत. व इतर १० ते १२ लोकांची चौकशी सुरू आहे अनेकांवर गुन्हे दाखल झाले असून अनेक आरोपीं सापडत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून श्रीगोंदा शहरातील हे भेसळखोर दुधात भेसळ करून करोडो रुपये कामावत आहेत.व यांची टोळी दुधात केमिकल मिक्स करून अनेक निरपराध लोकांचे जीव घेत आहे. Whey peremeate powder व light liquid paraffin च्या मित्रणातून मानवी आरोग्यावर अत्यंत घातक असा परिणाम होत आहे.त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात असून कॅन्सर चे प्रमाण वाढत आहे.
दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा विषय सभागृहात मांडला असून आज आमदार सुरेश अण्णा धस यांनी सुद्धा लक्षवेधी मांडून हा प्रश्न राज्यव्यापी केला आहे. SIT ची नेमणूक झाली तर यात अनेक बडे मासे गळाला लागतील त्यामुळे सखोल चौकशी व्हावी.दूध माफिया यांच्या मुळे अनेक लोक कॅन्सर ने मरतील त्यामुळे सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी – टिळक भोस
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
दुधात भेसळ करणारी टोळी ही संघटित गुन्हेगारी असून जनतेचे जीव धोक्यात घालून पैशे कमावनारे हे लोक भेसळ करणारे उत्पादक- चिलिंग प्लांट धारक-केमिकल वितरक-उत्पादक- प्रक्रिया उद्योजक अशी मोठी टोळी राज्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यरत आहे,त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी
व राज्यातील हे रॅकेट समूळ नष्ट करण्यात यावे
भेसळीच्या दूध धंद्यातून अमाप माया गोळा करणाऱ्यांची चौकशी करून इनकम टॅक्स विभागामार्फत धाडी टाकण्यात याव्यात.
उमेश सूर्यवंशी (निरीक्षक)
अन्न व औषध प्रशासन यांनी आरोपी बाळासाहेब पाचपुते यांच्यावर दिनांक १६ मार्च २०२३ ला धाड टाकल्यावर ३६ तासांनंतर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे मुख्य आरोपी बाळासाहेब पाचपुते याला फरार होण्यासाठी जाणीवपूर्वक संधी दिली गेली. त्यामुळे मुख्य आरोपी फरार आहे.तसेच उमेश सुर्यवंशी हे ६ वर्षांपासून अहमदनगर येथे कार्यरत असून यांच्या काळात कधीच प्रभावी कारवाया झालेल्या नाहीत.
तसेच त्यांनी जिल्ह्यातील भेसळीचे दूध
उत्पादित होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.व त्यातुन करोडो रुपयांची माया जमा केली आहे त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मार्फत व अन्न व औषध विभाग आयुक्त यांकडून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
अन्न व औषध प्रशासन विभागात अपुरा कर्मचारी/अधिकारी वर्ग असल्याने अहमदनगर जिल्ह्यात भेसळीचे प्रमाण खूप आहे.त्यामुळे जास्तीचे अधिकारि कर्मचारी यांची संख्या वाढवण्यात यावी.
दूध व अन्न पदार्थ यांमध्ये भेसळ करणाऱ्या व्यक्तींना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी.महाराष्ट्र विधिमंडळाने हा कायदा तातडीने करावा.
दूध भेसळ रॅकेट ची व्याप्ती मोठी असल्याने व राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याने CID विभाग अथवा पोलीस महासंचालक मार्फत कसून चौकशी करण्यात यावी.
श्रीगोंदा तालुक्यातील रॅकेट चा सबंध आष्टी- करमाळा-शिरूर-पारनेर-नगर- बारामती अशा अनेक ठिकाणी आहे त्यामुळे एकाच वेळी छापे टाकून रॅकेट उध्वस्त करण्यात यावे.
दूध भेसळ रॅकेट मधील सर्व आरोपी दूध उत्पादक-चिलिंग प्लांट मालक-भेसळ साहित्य विक्रेता-भेसळ साहित्य उत्पादक-भेसळीच्या दुधापासून उत्पादन बनवनारे उत्पादक व रॅकेट मध्ये सहभागी असणारे सर्व यांस तडीपार करण्यात यावे.
सर्व आरोपींचे बँके खाते सील करण्यात यावेत, दूध भेसळ करणाऱ्या विरुद्ध केंद्र सरकारने कडक कायदा करण्यात यावा.दूध भेसळ करणारे सर्व प्लांट सील करण्यात यावेत
अशा अनेक मागण्या आंदोलकांनी मांडल्या. यावेळी बाबासाहेब भोस, दत्तात्रय पानसरे, डॉ.प्रनोतीमाई जगताप, बाळासाहेब नाहाटा, आदेश नागवडे, संभाजी बोरुडे, प्रा.बाळासाहेब बळे,भाऊसाहेब खेतमालिस,सुनील वाळके, बापुतात्या गोरे,रमेश लाढाणे,संजय खेतमाळीस, सतीश बोरुडे,युवराज पळसकर,वैभव मेथा, जहिर जकाते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन