टीम लोकक्रांती
लिंपणगाव, श्रीगोंदा | दि.१२ एप्रिल २०२३ :
कांदा उत्पादक शेतकन्यांना प्रती क्विंटल ३५०/- रुपये अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. परंतु त्यासाठी संबधीत शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक असल्याची अट आहे. परंतु ही अट शिथिल करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे अशा मागणीचे निवेदन नागवडे कारखान्याचे चेअरमन व जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात श्री नागवडे यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदारांना निवेदन सादर केले असून सदर निवेदनात नागवडे यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणांत आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडून पिकांची नोंद सात-बारा उताऱ्यावर केली जात नाही. आजही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस, गहू, हरभरा, भुईमुग, कांदा, डाळिंब, द्राक्ष, लिंबू अशी पिके आहेत. परंतु त्या सर्वांची नोंद सात-बारा उताऱ्यावर नाही. त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांकडून कांदा पिकाच्या नोंदी करणेचे राहिलेले आहे.
तथापि अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकाचे उत्पादन घेवून तो कांदा मार्केट कमिटी अथवा खाजगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने कांदा विक्री केलेला आहे. त्याच्या पावत्या त्यांच्याकडे आहेत. त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कांदा अनुदान योजनेचा लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
असे सांगून नागवडे यांनी पुढे या निवेदनात आणीखी म्हटले आहे की, ७/१२ उताऱ्यावर नोंद नाही म्हणुन तो शेतकरी अनुदानापासून बाधित राहु नये याकरीता संपूर्ण नगर जिल्ह्यातील सर्व संबंधीत तहसिलदार/ सर्कल /कामगार तलाठी यांना सुचीत करुन सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदी ७/१२ उताऱ्यावर घेवून त्यांना शासनाच्या कांदा अनुदान योजनेचा लाभ मिळवून द्यावा . अशी मागणी या निवेदनात नागवडे यांनी केली आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, त्यासाठी शासनाने सरसकट अनुदान दिले तर निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळेल, असे देखील नागवडे यांनी म्हटले आहे.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे, धनसिंग भोईटे, प्रेमराज भोईटे, नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, भाऊसाहेब बरकडे, प्रशांत दरेकर, विश्वनाथ गिरमकर, भाऊसाहेब नेटके, हेमंत नलगे, मनोहर पोटे, विलासराव काकडे आदी नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन