टीम लोकक्रांती
घोडेगाव, श्रीगोंदा | दि.१३ एप्रिल २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे जलजीवन योजनेअंतर्गत गावातील लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी मंजूर झाली आहे परंतु टाकी कुठे बांधायची यावरून वाद निर्माण झाला आहे. गावातील प्राथमिक शाळेभोवती मुलांची व मंदिराशेजारी ग्रामस्थांची रहदारी असते इथे जर पाण्याची टाकी बांधली तर रहदारीस अडचण निर्माण होत आहे व गावातील मध्यवर्ती भागात पटांगण राहत नाही त्यामुळे येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करू नये अन्यथा गावातील काही ग्रामस्थांनी दि. १७ एप्रिल रोजी उपोषण करणार असल्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
महाराष्ट्रा मध्ये बहुतांश भाग दुष्काळी आहे ग्रामीण भागातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने जलजीवन योजना आणली आहे आणि गावोगावी या योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा शासन करत आहे परंतु श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे या योजनेअंतर्गत पाण्याची टाकी मंजूर झाली आहे परंतु ती बांधायची कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि ह्या प्रकरणी काही ग्रामस्थांनी उपोषण करणार असल्याचे शासन दरबारी निवेदन दिले आहे.
चौकट :
जल जीवन मिशन अंतर्गत ८४ लक्ष रुपये निधी दोन पाण्याच्या टाक्यांसाठी मंजूर झालेला आहे ही योजना पूर्ण झाली तर गावातील गोरगरीब जनतेला पिण्याचे पाणी मिळणार आहे मागील दोन महिन्यांपासून गावठाणातील पाण्याच्या टाकीसाठी जागेचा शोध सुरू आहे या आधी चार ठिकाणी काम सुरू करून परत जागा बदलून दुसरी कडे काम सुरू केले आहे गावामध्ये जुन्या पाण्याच्या टाकी शेजारी ग्रामपंचायतची जागा आहे तेथे आत्ता काम सुरू आहे जर हे काम बंद पडले तर शासनाचा मंजूर झालेला निधी परत जाऊ शकतो. – घोडेगाव ग्रामपंचायत सरपंच रामदास घोडके
चौकट :
मागील एक वर्षापासून पाण्याच्या टाकी संदर्भात कुठलाही ठराव घेतला नाही कुठलाही प्रस्तावही नाही ग्रामविकास अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता ते उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत. या मध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचे नाकारता येत नाही. गावामध्ये पटांगण असणे गरजेचे आहे त्यात जर आत्ता पाण्याची टाकी या पटांगणात केली तर गावातील रहदारीस अडथळा निर्माण होईल. जर दोन पाण्याच्या टाक्यांसाठी निधी मंजूर झाला आहे तर आधी गावातील पाण्याची टाकी बांधण्याचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे – माजी सरपंच लक्ष्मण मचे
घोडेगाव येथील ग्रामस्थांनी गटविकास आधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा यांना दिलेल्या निवेदनात असं म्हटले आहे की मौजे घोडेगाव मध्ये महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन योजनेअंतर्गत पाणी टाकीचे काम मंजुर झालेले असुन ते गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ करणार असल्याचे समजते. परंतु सदरील पाणी टाकी काम झाले तर तेथील रहदारीस तसेच शाळेतील मुलांना अडचणी व धोकादायक ठरेल. तसेच तुळजाभवानी मंदीरामध्ये धार्मिक कार्यक्रम होत असतात त्यास देखील अडचणी निर्माण होतील व सदरची जागा ही ग्रामसभेने ठराव करुन मंदीरासाठी धार्मिक कार्यक्रमासाठी दिलेली आहे. तरी या योजने अंतर्गत होणारे पाणी टाकीचे बांधकाम हे शाळेजवळ न करता ते अन्य ठिकाणी करण्यात यावे.किंवा
गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापूर्वी टाकी बांधण्यात आलेली आहे तिचा ग्रामस्थांना काहीही उपयोग झालेला नाही, ती टाकी उपयोगात आणावी ही ग्रामस्थांची मागणी आहे, यासाठी सरपंच साहेब यांना वारंवार तोंडी सांगून व अर्ज करूनही पाण्याची टाकी शाळेजवळच करण्याचा आट्टाहास धरलेला आहे. त्यामुळे सोमवार दि. १७ एप्रिल २०२३ रोजी पंचायत समिती श्रीगोंदा येथे सर्व ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे.या उपोषानासाठी ग्रामपंचायत सदस्य व श्री जगदंबा बहुउद्देशीय सार्वजनिक ट्रस्ट घोडेगाव आणि सर्व ग्रामस्थांचा सहभाग राहणार असल्याचे निवेदनाद्वारे सांगितले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन