टीम लोकक्रांती
पिसोरे खांड, श्रीगोंदा | दि.२४ एप्रिल २०२३ :
शनिवार दि.२२ एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभमुहुर्तावर श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथील बारव दिपोत्सव , जलपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी कुकडी कारखान्याचे चेअरमन राहुल दादा जगताप, शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे उपस्थीत होते. बुजलेली बारव गावचे सरपंच यांनी पुन्हा नव्याने संवर्धित केली आणि बारवेला जीवदान दिले. म्हणून पुनर्जीवित बारव लोकार्पण सोहळा पार पडला.
दररोज नजरें समोर असूनही, नजरेंआड गेलेला वारसा दीपोत्सव साजरा करून पुन्हा नजरेत आला! यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र बारव मोहीमचे समन्वयक शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेचे श्रीगोंदा तालुक्यांतील गावोगावचे अनेक शिलेदार मावळे व रणरागिणी उपस्थीत होत्या. श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी बु. येळपने, वडाळी, लोणी व्यंकनाथ, गार, मखरेवाडी, औटेवाडी, घारगाव, कोळगाव या सर्व गावातून ५० पेक्षा जास्त शिलेदार सदस्य उपस्थित होते. सर्वांनी स्वयंसेवक म्हणून महत्वाची भूमिका बजावली.
बारव बांधण्यात जरी आपला हात नसेल, तरीही बारव जतन करण्यासाठी आपले योगदान नक्कीच असावे”.म्हणूनच शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्था काम करत आहे. संस्थेचे सदस्य झोकून देऊन काम करत आहेत.यासाठी ऐतिहासिक क्षणाचे उपस्थीत सर्वजण साक्षीदार झाले.
वैशिठ्यपूर्ण माहिती-
काळानुसार बारवेचे महत्व व वापर कमी झाल्याने सदरची बारव बुजविण्यात आली होती.संपुर्ण पायरी मार्ग मातीने बुजवण्यात आला होता. कमान दगडांनी बंद केली होती. मंदिर कोस्टक पूर्णपणे बुजविण्यात आले होते.फक्त गोलाकार विहीर दिसत होती. विहिरीतील पाणी उपसा नसल्याने दूषित झाले होते. ही वास्तू अडगळ वाटत होती. परंतु उच्चशिक्षित सरपंच विकास हनुमंत इंगळे यांनी ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुढाकार घेतला. संपूर्ण महाराष्ट्रभर बारव जतन करण्यासाठी “महाराष्ट्र बारव मोहिम” सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यांत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने ही मोहिम जोर धरत आहे. हे पाहून आपल्या पिसोरे खांड गावातील ही पुरातन बारव पुनर्जीवित करण्यासाठीं गावातील तरुणांना, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ही बारव पुनर्जीवित केली. पंधरा दिवस हे काम सुरू होतें. गाळ काढण्यासाठी यारी बसविण्यात आली. तळाशी असणारा सुमारे १२ फूट खोल गाळ, दगड,माती बाहेर काढण्यात आले. पाण्याचे जीवंत झरे पुन्हा खळखळून वाहू लागले.काही पायरी मार्ग जेसीबीच्या साहाय्याने उकरण्यात आला तर उर्वरित मनुष्यबळ वापरून बाहेर काढण्यात आला.या ऐतिहासिक बारवेचा कायापालट झाला. ही बारव पुन्हा मूळ रुपात अवतरली. आता सुमारे १५/१६ फूट नितळ आणि शुध्द पाणी बारवेत आहे. यामुळे भविष्यात दुष्काळाची दाहकता नक्कीच कमी होईल.
आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने निर्माण केलेला हा ऐतिहासिक वारसा नव्याने संवर्धित झाला. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात ही ऐतिहासिक घटना प्रथमच घडली आहे.याकामी खर्चही मोठा झाला असुन हा खर्च सरपंच विकास इंगळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन केला आहे. “जिथे राबती हात तिथे हरी!! याचा प्रत्यय येतो. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले पुरातन जलस्रोत भविष्य कालीन दूरदृष्टीने विचार करून गावांसाठी पुनर्जीवित करणारे उदार व्यक्तिमत्त्व क्वचितच पाहायला मिळतात. या कामी जे जे हात राबले, ज्यांनी कष्ट घेतले. आणि ज्यांनी ज्यांनी दूरदृष्टीने विचार करून ही बारव पुनर्जीवित केली त्या त्या सर्वांना नक्कीच आपल्या पूर्वजांचे आशिर्वाद लाभले आहेत. श्रीगोंदा तालुक्यांतील बारवा पुनर्जीवित करण्यासाठीं महाराष्ट्र बारव मोहिमेचे समन्वयक शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराने मोठी भुमिका बजावली आहे.
पाणीदार सरपंच-
बुजवीलेली बारव पुन्हा मोकळी केली, पुरातन जलस्रोत पुन्हा नव्याने मोकळे केले. आणि आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाने बांधलेला ऐतिहासिक वारसा संवर्धित केला. महाराष्ट्र बारव मोहिमेचे समन्वयक शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने पाणीदार सरपंच म्हणून कुकडीकारखान्याचे चेअरमन राहुलदादा जगताप व कोरोना वॉरियर्स देवदूत डॉ. चंद्रशेखर कळमकर यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्राला आणि समाजाला दिशादर्शक कार्य करणाऱ्या या ऐतिहासिक कार्याबद्दल महाराष्ट्र बारव मोहिमेचे प्रणेते रोहन काळे, इतिहास संशोधक अनिल दुधाने, यांनी सरपंच, आणि सर्व पिसोरे खांड ग्रामस्थांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन