टीम लोकक्रांती
श्रीगोंदा | दि.२७ एप्रिल २०२३ :
सध्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून त्यामध्ये श्रीगोंदा मार्केट कमिटीची निवडणूक नागवडे व पाचपुते गट अतिशय एक दिलाने व विश्वासाने लढवीत असून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बेबनाव नाही. ही निवडणूक सर्व कार्यकर्त्यांनी परस्पर विश्वासाने हातात घेतलेली असल्यामुळे किसान क्रांती शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय होणार असल्याची खात्री असल्यानेच विरोधक बेबनाव निर्माण करण्याचा लाजिरवाणा खटाटोप करीत आहेत. परंतु नागवडे व पाचपुते गटाचे सर्व कार्यकर्ते सुज्ञ असून विरोधकांच्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत तर प्रामाणिकपणे काम करून ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास राजेंद्र नागवडे व प्रतापसिंह पाचपुते यांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यात शिवाजीराव नागवडे व आ. बबनराव पाचपुते यांच्या आश्रयाखाली मोठे झालेले कार्यकर्ते आज स्वतःला नेते म्हणून घेत असून अतिशय कृतघ्नपणे गलीच्छ राजकारण करून नागवडे व पाचपुते यांनाच बदनाम करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत. परंतु निष्ठावान नागवडे पाचपुते गटाचे सैनिक अशा लबाड नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. असा विश्वास नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व परिक्रमा शिक्षण संकुलाचे सचिव प्रतापसिंह पाचपुते यांनी संयुक्तरित्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केलेला आहे.
स्व. शिवाजीराव नागवडे यांनी सहकारात आदर्शवत काम केले त्यांचा वारसा घेऊनच आज नागवडे कारखान्याची वाटचाल चालू आहे. परंतु बापूंचे नाव घेऊन त्यांच्या पुण्याईच्या नावावर राजकीय पोळी भाजू इच्छिणाऱ्या विरोधकांनी आपल्या कारखान्यात काय दिवे लावलेत याचा अभ्यास करावा. बापूंचे नाव घेण्याची लायकी, पात्रता व अधिकार नसणारी मंडळी त्यांचा फोटो छापून मतांची भीक मागत आहेत. स्वर्गीय बापू व कुंडलिक तात्या जगताप यांनी तालुक्यात सहकार रुजवला व वाढवला परंतु त्याचा लिलाव केला नाही. आज शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले दिले नाहीत, कामगारांचे पगार नाहीत, कर्जाचे डोंगर उभे करून बँकांकडून जप्तीच्या नोटीस आलेल्या असताना आम्ही नागवडेंचे वारसदार आहोत असे सांगून मोठेपणाचा आव आणीत आहेत हे अत्यंत हास्यास्पद आहे. स्वर्गीय बापू व तात्या यांचे नाव घेऊन मते मागण्याचा अधिकार राहुल जगताप यांनी गमावलेला आहे.
नागवडे कारखान्याच्या एका जागेच्या पोटनिवडणुकी करिता बबनराव पाचपुते यांच्या सूचनेनुसार संदीप नागवडे, वैभव पाचपुते व कुंडलिक भोसले यांनी अर्ज भरले होते व त्यांच्याच सूचनेनुसार विरोधकांनी मागणी करण्याच्या अगोदरच तिघांनीही एकत्रितरित्या जाऊन त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता जगताप गटाच्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन नागवडे व पाचपुते यांनी केले आहे.
स्व. शिवाजीराव नागवडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ५५ -६० वर्ष तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अविस्मरणीय योगदान दिलेले आहे. तसेच आ. बबनराव पाचपुते यांनी गेल्या ४० वर्षात तालुक्याला समृद्ध करण्याकरिता सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. दोन्ही नेते एकमेकांचे विरोधक होते. परंतु त्यांनी राजकारणातील नैतिकता अबाधित ठेवली होती. त्यांच्या सावलीत जन्माला आलेले व वाढलेले कार्यकर्ते पुढे नेते झाले. सोयीनुसार कधी नागवडे तर कधी पाचपुते यांचा आश्रय घेऊन मोठे झाले. विविध सत्ता पदे मिळविली व त्या माध्यमातून माया कमावली.त्या मायेच्या जोरावर अतिशय कृतघ्नपणे नागवडे व पाचपुते यांच्यावर वाटेल तशी गरळ ओकून त्यांना बदनाम करायचे व त्यांच्या वारसदारांचे राजकारण संपुष्टात आणण्याचा कुटील डाव या मंडळींनी सुरू केलेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी नागवडे पाचपुते यांचेच नाव घेऊन बातम्या प्रसिद्धीस देतात हे फार मोठे दुर्दैव आहे. या तथाकथित नेत्यांनी अगोदर आपल्या जीवनात वैचारिक नैतिकता आणावी, सामाजिक बांधिलकी पाळावी व ज्यांच्या बोटाला धरून मोठे झाले आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञ बाळगणे गरजेचे असल्याचे नागवडे व पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन