टीम लोकक्रांती
कोळगाव, श्रीगोंदा | दि.२० मे २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरू असून ज्यांनी डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले नाही, कारखान्यावर जप्ती नोटीसा आल्या, कोट्यावधींची कर्ज थकली, सगळा भंगार कारभार असतानाही खोटे नाटे जनतेला बिंबवले जाते, सर्वत्र बेबनाव चालला आहे, असे असतानाही आपण खूप मोठे नेते आहोत हे दाखवणाऱ्यांचे सध्या तालुक्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे, अशी टीका विरोधकांवर श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने कोळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश लगड सावकार होते.
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघात अनुराधा नागवडे यांचे जनसंवाद अभियान कोळगाव गटामध्ये सुरू असून आज कोळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे बोलताना म्हणाले की, कुकडीच्या पाण्यासाठी गेटतोडो आंदोलन केले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. दुष्काळामध्ये चारा छावणी जनावरांसाठी उभा केली, श्रीगोंदा कारखाना योग्य रीतीने चालवला, कारखान्याची कपॅसिटी वाढवली, ९० कोटीचे कोजन पूर्ण केले. कर्जफेड वेळेत चालू आहे, सध्या सीडीजीसी गॅसचे काम सुरू असून लवकरच शेतकऱ्यांसाठी गॅस आउटलेट उभा करणार आहोत, बगॅस पासून ब्रिगेट तयार करण्याचे काम चालू आहे, डिस्टिलरी वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
कुकडीच्या पाण्यासाठी पंधरा तारखेला पाणी सोडण्याच्या ऐवजी १३ तारखेला पाणी सोडून विसापूर तलाव भरून घ्यावा असा मुद्दा मांडला, कुकडीच्या लाभ क्षेत्रामध्ये आठ गावे लावादाकडे न्याय मागून समाविष्ट केली. पंचायत समिती, तहसील कार्यालय येथील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले, दुष्काळामध्ये दौरे केले, मुला मुलींचे १०० सार्वजनिक विवाह पार पाडले. कारखाना, शिक्षण संस्था येथे सर्वात जास्त कोळगाव मधील नोकरदार काम करत आहेत ,परंतु त्यांच्यावर कधीही दबाव टाकला नाही.
श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजला ए प्लस नामांकन आहे.मागील महिन्यात करिअर कट्टा मार्फत ४० मुले पोलीस भरती झाली, गेल्या दोन वर्षात ४०० मुलांना नोकरी मिळाल्या. कॉलेजमधील करिअर कट्टा संपूर्ण राज्यात प्रथम आहे. वेगवेगळ्या लॅब उभे केल्या, मुलींसाठी होस्टेल बांधले.गरजू मुलांना आर्थिक मदत दिली. कै. शिवाजीराव नागवडे गेल्यानंतरही पाच वर्षापासून कारखाना, शिक्षण संस्था पूर्वीप्रमाणेच चालू आहेत.
कसलाही अनागोंदी कारभार नाही, कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले नाही, तालुक्यात सीबीएससी पॅटर्नचे इंग्लिश मीडियम उत्कृष्टपणे चालू आहे, असे असतानाही तालुक्यातील नागरिक भूलथापांना बळी पडतात, चांगल्या माणसांना साथ देत नाही ,नागरिक चुकीचे निर्णय घेतात, बरोबर राहत नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जनतेशी प्रत्यक्ष संवाद रूपाने संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी ,समस्या सोडवण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू केल्याचे प्रतिपादन राजेंद्र नागवडे यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी सतीश लगड सावकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन लगड यांनी केले. कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच नितीन नलगे, अमित लगड ,शरद लगड,सामाजिक कार्यकर्ते कल्याण नलगे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन जालिंदर साबळे, धोंडीबा लगड, बी.के लगड, काटे सर ,भरत लगड, घोंडगे सर, आबासाहेब लगड, संभाजी लगड, संजय मेहेत्रे, सुनील नलगे, बबन लगड, सुनील डुबल, बाळासाहेब लगड मेजर, ओंकार नलगे, आप्पासाहेब लगड, संतोष मेहत्रे, जयराज लगड, संकेत लगड, हनुमंत लगड तसेच परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन