टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.३० ऑगस्ट २०२२ : दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी बाळासाहेब नाहाटा यांच्या वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा व कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा सुमारे दोन कोटी रुपयांचे शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेले १००० मॅट्रिक टन क्षमतेच्या गोडाऊनचे उद्घाटन अजित दादा पवार यांच्या हस्ते सकाळी ११:०० वाजता होणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे मुंबई बाजार समितीचे सदस्य व महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांनी आज श्रीगोंदा सहकार बँक सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास आबा शिर्के, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, भाऊ खेतमाळीस, विवेक पवार, कल्याणराव जगताप, शांताराम पोटे व सागर बोरुडे तसेच कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.राज्याचे माजी उप मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी मला महाराष्ट्र राज्य बाजार समिती अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली व मुंबई बाजार समिती सदस्य पदी नियुक्ती केले. त्याचवेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होतो. परंतु,अजितदादांनी मला सांगितले की, मी जेव्हा श्रीगोंदा येथे येईल, तेव्हा पक्षात प्रवेश करा असे ते म्हणाले. माझ्यासोबत तालुक्यातील अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, केशव भाऊ मगर, संजय जामदार आदी नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्याने त्यांचा प्रवेश लांबणीवर गेला. दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी माझ्यासोबत शरद नवले राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. पुढील काळात अजित दादा पवार जो निर्णय घेतील व बाबासाहेब भोस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे नाहाटा यांनी सांगितले.
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, अभिष्टचिंतन सोहळा, गोडाऊन उद्घाटन इत्यादी कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बाळासाहेब नाहटा यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.
काही कारणास्तव माजी आमदार राहुल जगताप नमूद पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहू शकले नाहीत तरी त्यांनी यावेळी नाहटा यांच्या फोन द्वारे दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी अपेक्षा व आवाहन तालुक्यातील ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना यावेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.
पत्रकार परिषदे मध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना बाळासाहेब नाहाटा, घनश्याम अण्णा शेलार, बाबासाहेब भोस यांनी उत्तरं दिली. तर, बाबासाहेब भोस व बाळासाहेब नाहाटा यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
स्त्रोत:पत्रकार परिषद