लोकक्रांती Online
श्रीगोंदा, दि.२ ऑक्टोबर २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी कामगारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लवकरच तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तालुका पदाधिकाऱ्यांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा कार्याध्यक्ष पदी राजेंद्र राउत, तालुकाध्यक्षपदी शाम जरे, शहराध्यक्ष पदी विनोद मेहेत्रे यांची निवड करण्यात आली. यावेळी दिलिप वाळुंज, राहूल साबळे, रामभाऊ घोडके, गोरख घोडके, जिल्हा कार्याध्यक्ष बंटी भिंगारदिवे, दिलिप लबडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी परकाळे यांनी सांगितले की, आम्हीं संभाजी ब्रिगेड सोबत वीस वर्षांपासून सक्रिय आहोत. पुरोगामी आणि महामानवांचे विचारप्रवर्तक कामे संघटनेमार्फत चालु असुन महापुरुषांचा संघर्षमय वारसा घेऊन कामं करत आहोत. सध्या शिवसेना सोबत असलो तरी स्वतंत्र काम करण्याची संघटनेची पद्धत आहे.
येत्या १५ ते २० ऑक्टोबरच्या आसपास तालुकास्तरीय मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यामध्ये तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णायक भूमिका घेणार आहोत. संभाजी ब्रिगेडच्या चळवळीत काम करणाऱ्या व नव्याने संघटनेत सामील झालेल्यांना पदाधिकाऱ्याना त्यांनी शुभेच्छा दिल्या. तर संघटनेसाठी कठीण काळात लढणाऱ्या पदाधिकऱ्यांचे त्यांनी स्वागत केलं. शासनाच्या कंत्राटी पद्धतीला आमचा विरोध असून काही सामाजिक घटनांत एका विशिष्ठ समूहाला टार्गेट केलं जातं. मात्र त्यातील वस्तुस्थिती वेगळी असते असेही ते म्हणाले.
राजकीय प्रक्रिया जिवंत ठेवण्यासाठी श्रीगोंद्यातील पाणी प्रश्न तेवत ठेवत सामान्य नागरिकांना वेड्यात काढण्याचे काम श्रीगोंद्यातील राजकारणी करत असल्याचे जिल्हाध्यक्ष परकाळे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक कामाचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात उस कारखान्यावर शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारणे, शेतकऱ्यांचे उसाचे पैसे थकवने असे प्रकार समोरं आले आहेत.
मेळाव्यात शेतकऱ्यांची थकीत ऊस बिल मिळावेत यासाठी व कंत्राटी पद्धत विरोधी भूमिका मांडण्यात येणार असुन साकळाई योजना तालुक्याला वरदान ठरू शकते. एमआयडीसी मुळे या भागात औद्योगिक विकास होऊ शकतो. रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र झारीतील शुक्राचार्य याप्रशानावर बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे एमआयडीसी व सकळाई या दोन्ही प्रकल्पासाठी जनआंदोलन उभे करणार असल्याचे परकाळेंनी स्पष्ट केले.
शासनाने कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून सुरु केलेल्या जलजिवन योजनेच्या माध्यमातून घर तिथे नळ होईल मात्र त्यातुन पाणीपुरवठा होईल का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुकीत श्रीगोंदा पालिकेत संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी निवडून देण्याची तयारी दर्शवली. तालुका कार्यक्षेत्रात मागास प्रवर्गातील आणि अल्पसंख्यांक समुहाच्या सनदशीर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ब्रिगेड त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल अशी ग्वाही दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी ब्रिगेड आग्रही राहणार असल्याचेही स्पष्ट केले.