लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.११ जानेवारी २०२४ :
श्रीगोंदा शहरातून जाणारा नव्याने तयार झालेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे त्यामुळे बीड, परळी, आंबेजोगाई, जामखेड या भागातून पुणे मुंबईकडे जाणारी वाहतूक या राष्ट्रीय महामार्गावर वाढली आहे. याचाच परिणाम म्हणून श्रीगोंदा शहराच्या रहदारीच्या भागांमध्ये सर्रास वाहनांची कोंडी झालेली पाहण्यास मिळते यावर रस्ते वाहतूक पोलीस प्रशासनाचा कसलाही अंकुश नाही शहरातील नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे आणि नागरिकांची सुरक्षा आता रामभरोसे झाली आहे असंच म्हणावं लागेल.
श्रीगोंदा शहरामध्ये महाविद्यालयांची संख्या मोठी असून शहरामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही खूप आहे त्यामध्येच आता विद्यार्थी टू व्हीलर वरुन कॉलेजला येताना दिसत आहेत श्रीगोंदा बस स्थानक ते शिवाजीनगर या भागात रस्त्यावर मोठी रहदारी पाहण्यास मिळते. यावेळी वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवले जातात ट्रिपल सीट टू व्हीलर चालवणारे बेशिस्त तरुण प्रचंड वेगात गाड्या पळवतात आणि वाहतुकीचे नियम मोडतात त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते.
शहरातील याच मुख्य रस्त्यावर कसलाही डिवाइडर नाही रस्त्याच्या कडेला फूटपाथ नाही त्यामुळे वाहन धारकांनी चार चाकी वाहने रस्त्याच्या मधोमध डिवायडर प्रमाणे पार्क केलेली आढळून येतात तर व्यवसायिकांच्या दुकानासमोर टू व्हीलर गाड्या मोठ्या संख्येने उभ्या असतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघात घडतात यासाठी वाहतूक पोलीस प्रशासन कुठेच काम करताना दिसत नाहीत मोठा अपघात झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार का असं नागरिकांमधून बोलले जात आहे.
- बेशिस्त वाहनांवर कारवाई केली आहे वाहतूक पोलीस काम करत आहेत दिवसातून दोनदा पेट्रोलिंग चालू आहे शहरामध्ये एकाही अपघाताची नोंद नाही – ज्ञानेश्वर भोसले, पो. नि. श्रीगोंदा