लोकक्रांती
श्रीगोंदा/लिंपणगाव दि.१९ जानेवारी २०२४ :
स्व.शिवाजीराव नागवडे बापू यांचा ९० व्या जयंती सोहळा कारखाना कार्यस्थळावरील इंदिरा गांधी विद्या निकेतनच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते. सहकार व शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंचा वारसा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी खंबीरपणे चालवला असून, आपण निश्चित यापुढे राजेंद्र नागवडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार महर्षी बापूंच्या ९० व्या जयंती सोहळ्याप्रसंगी बोलताना दिली.
यावेळी सहकार महर्षी बापूंच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पुढे म्हणाले की, बापूंना आणि मला विधिमंडळात एकत्र काम करण्याची संधी मिळाली एक सहकाराचे दूरदृष्टी व खंबीर नेतृत्व असणारे शिवाजीराव नागवडे बापू यांनी श्रीगोंदा तालुक्याच्या जडणघडणीसाठी अहोरात्र परिश्रम घेऊन सहकार, शिक्षण, सिंचन क्षेत्रात त्यांनी नेत्रदीपक काम केले. असे सांगून ना. पवार पुढे म्हणाले की, नगर जिल्हा हा अतिशय संवेदनशील जिल्हा समजला जातो. सहकार क्षेत्राला या जिल्ह्याने राज्यात नव्हे तर संपूर्ण देशाला उत्तम प्रकारे दिशा देण्याचे काम या जिल्ह्यातील या थोर विभूतींनी दिलेले आहे. त्यामध्ये पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राज्याच्या हितासाठी सहकाराची मुहूर्तमेढ या थोरमंडळींच्या बरोबरीने सहकार महर्षी बापूंनी देखील अविरतपणे सतत विकासाचा ध्यास घेत काम केले. विकासाच्या दृष्टीने बापूंनी आपला संपूर्ण राज्यात ठसा उमटविला आहे अशा या थोर नेत्याचे स्मरण करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे असे सांगून ना पवार पुढे म्हणाले की, श्रीगोंदा सारख्या या दुष्काळी तालुक्याच्या विकासात बापूंनी सत्तेत नसताना देखील सहकार, सिंचन, शिक्षण व कृषी क्षेत्रात भरीव काम केले. हे कोणीही नाकारू शकत नाही. असे सांगून नामदार पवार पुढे म्हणाले की, निश्चितच मी श्रीगोंदा तालुक्यातील आम सभासद व जनतेला व कारखााना प्रशासनाल धन्यवाद देतो की, या ऋषितुल्य नेत्याचा अभिमान वाटावा असा पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभा करून प्रसंगी तरुण पिढीला देखील बापूंच्या कार्याचे स्मरण होणार आहे.
ना. पवार आणखी पुढे म्हणाले की, बापूंनी जे कार्य बहुजनांसाठी पार पाडले, तेच कार्य त्यांचे पुत्र नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे दीपक नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे या खंबीरपणे पुढे चालवत आहेत. श्रीगोंदेकरांनी देखील राजेंद्र नागवडे व सौ अनुराधाताई नागवडे यांना यापुढे खंबीर साथ द्यावी, आपण देखील श्रीगोंद्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगत ना. पवार आणखी पुढे म्हणाले की, सहकार महर्षी बापू हे एक वचनी निष्ठावंत कार्यकर्ते होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे ते देखील खंदे समर्थक होते. दादांचाही बापूंवर मोठा विश्वास होता. स्वतःच्या स्वकर्त्यातून बापूंनी आपला राजकीय प्रवास गावच्या सरपंच, आमदार ते राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदापर्यंत एक नेत्र दीपक प्रामाणिकपणे उत्तम प्रकारे काम केले. बापूंनी साखर कारखानदारी उभारल्यानंतर जीव ओतून काम केले. म्हणूनच आज श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याचा चेहरा मोहरा बदललेला आहे. याची आठवणही पवार यांनी उपस्थितींना करून दिली. त्यामुळे श्रीगोंदाच्या जनतेने यापुढे नागवडे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
ना. पवार आणखी पुढे म्हणाले की न्यायप्रविष्ट बाबीमुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या नाहीत. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना पवार पुढे म्हणाले की, मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकले पाहिजे, त्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून कायदेतज्ञांची सल्लामसलत करत निर्णय घेत आहे. असे सांगून सहकार महर्षी बापूंच्या कार्यकर्तृत्वावर नामदार अजितदादा पवार यांनी स्तुती सुमने वाहिली.
अध्यक्षीय भाषणात नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी म्हणाले की, बापूंनी दूरदृष्टी ठेवून सहकाराच्या माध्यमातून सिंचन व शिक्षण क्षेत्रात भरीव असे योगदान दिले हे तालुक्यातील जनतेला सर्वश्रुत आहे बापूंनी दूरदृष्टी समोर ठेवत तालुक्यात गावोगावी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ज्ञानगंगा सुरू केली. त्यातून ग्रामीण भागासह अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुले उच्च पदस्थ बनले आहेत. शेतीला पाणी हवे म्हणून बापूंनी घोड कुकडी धरणाचे पाणी तालुक्याला मोठ्या संघर्षातून मिळविले. त्यामुळेच तुमच्या आमच्या जीवनामध्ये बदल झालेला दिसतो. तो केवळ बापूंच्या दूरदृष्टीमुळेच असे सांगून, श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की, आपणही तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत. तालुक्यातील जनतेच्या प्रत्येक संकटात कारखान्याच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोना कालावधीमध्ये रुग्णांसाठी जवळपास ३०० बेडची सोय केली. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला या कालावधीमध्ये दहा हजार रुपयाची मदत केली. नामदार अजित दादा हे दूरदृष्टीचे नेते आहेत आमच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नासाठी सुपा आणि विसापूरला एमआयडीसी व्हावी अशी अपेक्षा श्री नागवडे यांनी व्यक्त करत तालुक्याच्या हितासाठी आगामी निवडणुकीत सौ अनुराधाताई नागवडे यांना उभे करणार असल्याचे सांगून उपस्थित मान्यवर व जनतेचे श्री नागवडे यांनी आभार मानले.
याप्रसंगी आमदार बबनराव पाचपुते यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीत बापू आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो, परंतु आमच्यामध्ये कधी मनभेद झाले नाहीत. पुन्हा आम्ही एक दिलाने एकत्र येत असत असे सांगितले.
या आयोजित सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सिताराम गायकर, दादा फराटे ,सौ अनुराधाताई नागवडे, दीपक नागवडे, दीपक शिर्के, सिद्धेश्वर देशमुख, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, नगरसेविका सीमा गोरे, ज्योती खेडकर, राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा, कैलासराव पाचपुते, बाळासाहेब दूतारे, स्मितल वाबळे, शरद नवले, राकेश पाचपुते, प्रा भाऊसाहेब कचरे, राजेंद्र म्हस्के, सीताराम गायकर, कुंडलिक दरेकर, मितेश नाहटा, भगवान गोरखे यांच्यासह नागवडे कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक तसेच बापूंवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते शेतकरी व विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी केले. सूत्रसंचालन शंकर गवते यांनी तर आभार संचालक सुभाषराव शिंदे यांनी मानले.