लोकक्रांती
श्रीगोंदा, दि.२४ जून २०२४ :
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गौण खनिज उत्खननाच्या प्रकरणी कारवाई करायला गेलेल्या तलाठी आणि त्यांच्या पथकावर हल्ला झाला आहे. फिर्यादी शाहरुख रशीद सय्यद, वय ३० वर्षे, धंदा तलाठी बनपिंपरी, रा. राळेगण, ता. पारनेर, जि. अहमदनगर, यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून २०२४ रोजी सायंकाळी ५:४५ ते रात्री ८:३० या वेळेत चवरसांगवी शिवारातील सीना नदीपात्रात ही घटना घडली.
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पथकाने तहसीलदार श्रीगोंदा यांच्या आदेशाने अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी सदर ठिकाणी धाड टाकली. या वेळी वाळू भरलेले दोन विना क्रमांकाचे टिपर आणि एक जेसीबी मशीन अवैध उत्खनन करताना मिळून आले. त्यावेळी आरोपी सागर सुदाम बोरुडे, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर आणि त्याचे १२ ते १४ साथीदार यांनी सरकारी कामात अडथळा आणून फिर्यादी आणि पथकातील कर्मचाऱ्यांवर लाकडी दांडके आणि लोखंडी गजाने हल्ला केला. तसेच, आरोपींनी शिवीगाळ करत सरकारी वाहनाचे नुकसान केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यात फिर्यादी आणि पथकातील अन्य आठ कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे फिर्यादीच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३०७, ३५३, ३३२, ३७९, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६, ४२७ सह गौण खनिज कायदा कलम ३, १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटकेत नाहीत. प्रकरणाचा तपास स.पो.नि. अजय गोरड करीत आहेत.