बाळासाहेब नाहाटा यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुक्यातील ताकद वाढणार; दानशूर पणाचा नाहाटा पॅटर्न पुन्हा पहायला मिळणार! आज भव्य अभिष्टचिंतन सोहळा.!!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि. ३ सप्टेंबर २०२२ :    बाळासाहेब नाहाटा विशेष लेख : साखर सम्राट आणि प्रस्थापित नेतेमंडळीच्या श्रीगोंदा तालुक्यात अल्पसंख्याक समाजातील व साखर कारखान्याशी दुरान्वये संबध नसलेलं पण दातृत्व आणि कर्तृत्वाच्या जोरावर गेली १८ वर्षे राजकारणात समाजकारणात स्वतः भोवती वलय निर्माण करणार नाव म्हणजे प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा होय. बाळासाहेब नाहाटा हे राज्यातील ३१२ कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्र असलेल्या राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे सभापती आहेत. लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत सदस्य ते राज्यमंत्री दर्जा असलेल्या राज्यपातळी वरील महासंघाचे सभापती पदापर्यंतचा प्रवास हा सुखद, दुःखद, खडतर आणि तितकाच चमत्काराने भरलेला आहे. निडर पणा, तळागाळातील कार्यकर्त्यांना मदत, अडचणीला न घाबरता त्याला सामोरे जाण्याची तयारी अशा स्वभाव गुणामुळे ही वाटचाल सुखद झाली.

तसा बाळासाहेब नाहाटा यांना लहानपणीच भविष्यात राजकीय कारकीर्द करेल असे भविष्य दारी आलेल्या एका साधूने सांगितल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात आणि शालेय जीवनातच ते आमदार बबनराव पाचपुते यांचे फॅन बनले. शिक्षणानंतर त्यांनी आमदार पाचपुते हाच नेता पक्ष मानून, राजकिय शुभारंभ केला.
लोणी गावात नाहाटा कुटुंब दानशूर म्हणून, पंचक्रोशीत प्रसिध्द होते. तोही गुण बाळासाहेब नाहाटा यांच्यामध्ये आला राजकारण आणि समाजकारण याची सांगड बसली पैसे कमवताना मिळेल त्यातील काही रक्कम गरिबांना देण्याच्या वृत्तीमुळे ते तालुक्यात प्रकाशझोतात आले.

  • शेडगाव हे गाव बागायत शेतीचे गाव म्हणून तालुक्यात ओळखले जाते मला आठवतेय १० ते १५ वर्षांपूर्वी गावातील वाडी वस्ती वर जाणारे रस्ते हे काळया मातीचे होते पावसाळ्यात कुठल्याही वस्तीवर ग्रामस्थांना जायचे म्हणलेकी चार महिने चपला हातात घेऊन पॅंटी गुडघ्यापर्यंत वर करून चिखलतुडवीत वाड्या वस्त्या वर जावे लागत होते इतकी दयनीय अवस्था आमच्या शेडगावची होती बाळासाहेब नाहाटा यांनी दोन वेळेस गाव ते वाडी वस्ती रोड मुरुमीकरण केल्यामुळें आज पर्यंत पडत्या पावसात प्रत्येक ग्रामस्थांच्या दारात फोरव्हीलर,टुव्हीलर जाऊ शकते तब्बल ४० ते ५० लाख रुपये किंमतीचा मुरुम टाकुन रस्ता करण्याचे काम केले, ग्रामदैवत श्री दत्त मंदिर बांधकाम साठी ५१००० रुपये देणगी दिली तसेच कंपाऊंड कलर काम करुन दिले, असे अनेक सामाजिक व वैयक्तिक पातळीवर मदती केल्या,असे दानशुर व्यक्ती बाळासाहेब नाहाटा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,शुभेच्छुक विजय शंकरराव शेंडे सरपंच शेडगाव.

एरवी राजकारणी म्हणजे लोकांना देताना आपल्याला काही ठेवायचे.. हा राजकारणातील अलिखित नियम..! पण, नाहाटा त्याला अपवाद ठरले. आपल्या कमाईतील लोकांना द्यायचे हा नाहटा पॅटर्न बाळासाहेब नाहाटा यांनी आणला आणि त्याच काळात डबघाईकडे वाटचाल करणाऱ्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची संधी मिळाली आणि त्यांनी या बाजार समितीची आतुन बाहेरून सुधारणा केली.

राजकारण बाजूला ठेवले. मानधन नाकारले, श्रीगोंदयात जवळपास कुठेच भुईकाटा नसल्याने, बाजार समितीच्या आवारात भुईकाटा उभारला. येथील लिंबू देशातच काय परदेशात प्रसिद्ध आहेत.. पण, बाजार समितीच्या आवारात गाळे नव्हते. ते बांधले, त्यामूळे येथे सायंकाळी लिंबू खरेदी विक्री सोय झाली. अंतर्गत रस्ते, काष्टी तसेच घोगरगाव उप-बाजार समितीचे विकासकामे यातून श्रीगोंदा बाजार समिती राज्यात नावारूपाला आली. पुढच्या निवडणुकीत तर, सर्व नेत्यांनी बिनविरोध साठी प्रयत्न करून पुन्हा सभापती पदासाठी बाळासाहेब नाहाटा यांना संधी दिली.

दरम्यानच्या काळात बाळासाहेब नाहाटा यांनी पेडगाव पंचायत समिती गणा मध्ये स्वखर्चाने रस्ते, वीज खांब, मंदिर जीर्णोद्धार, शाळा बांधकाम, रोहित्रे बसविणे यातून येथील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले नाहाटा यांचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला गरीब मल्लांना खुराक, गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक तसेच सायकल मदत, रुग्णांना उपचारासाठी खर्च, स्वतः च्या लोणी गावातील मागासवर्गीय समाजातील २ जणांना घरकुल बांधणे, विंधन विहीर आदी लोकोपयोगी कामातून त्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली आणि २०१७ मध्ये पेडगाव गणातून नाहाटा यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला.

विशेष म्हणजे त्यांचे लोणी गाव बेलवंडी गण मध्ये मोडते. पण, कामामुळे दुसऱ्या गणातून आग्रह झाला. कागदपत्रे जमवतानाच मांडवगण जिल्हा परिषद गटातील भानगाव गणात उभे राहण्याची इच्छा नाहाटा यांनी व्यक्त केली. कारण, या भागात विकासाचा अनुशेष होता. भानगाव गणातील मतदारांनी इच्छापूर्ती केली. कारण, नाहाटा पॅटर्न या लोकांना माहीत होता. या गणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या वाडी वस्तीवर स्वखर्चाने बोअरवेल दिले. मंदिरावर विजेची सोय केली. रस्ते, पाणीपुरवठा योजना मार्गी लावली.

दरम्यान काळात आमदार पाचपुते यांच्याशी मतभेद झाल्याने पाचपुते गटाला सोडचिठ्ठी देत नागवडे, जगताप गटाला साथ दिली. पुढे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविले. जानकर यांची भाजपशी युती होती. जानकर यांनी २०१४ साली होणाऱ्या निवडणुकीत श्रीगोंदयाची जागा राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडण्याची मागणी केली. चर्चेत भाजपने श्रीगोंदयात नेहमीच पराभव होत असल्याने जानकर यांना श्रीगोंदा तुमचा पक्ष लढेल असे आश्वासन दिले. पण, आमदार पाचपुते यांनी त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश १० दिवसात केल्याने… रासप ला दिलेला शब्द भाजपने फिरवला.. म्हणून, नाहाटा अपक्ष उभे राहण्याची चाचपणी करतानाच आमदार पाचपुते विरुद्ध सर्व विरोधकांची मोट माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार बांधत होते.

त्यात बाळासाहेब नाहाटा राष्ट्रीय समाज पक्षाची भाजपशी युती असताना शरद पवारांच्या विचारा बरोबर उभे राहिले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राहुल जगताप यांचा पायाला भिंगरी लावून प्रचार केला आणि जगताप यांना विजयी करण्यात वाटा उचलला. याची राजकिय किंमत नंतर नाहाटा यांना २०१७ मध्ये आढळगाव जिल्हा परिषद गटात चुकवावी लागली.
दानशुरता आणि सामाजिक बांधिलकी पदातून न्याय देण्याची वृत्ती यामुळें राज्य बाजार समिती निवडणुकीत नाहाटा यांनी ओळखीतून नाशिक झोन मधून उमेदवारी अर्ज भरला. नामदार अजित दादा पवार यांनी त्याचवेळी नाहाटा यांना मोठी जबाबदारी देण्याचे ठरवून संचालक पदी बिनविरोध निवडून येण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

स्वतः जवळच्या इच्छुकांना माघार घेण्यास लावले आणि नाहाटा संचालक बनले. या संचालक मंडळात आमदार, मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्ती पाहून, आपण सभापती होऊ..! असा विचारही नाहाटा यांनी केला नव्हता. परंतु, ज्या व्यक्तीने श्रीगोंदा बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलला.. शिवाय १२-१३ वर्षे सभापती पदाचे लाखो रुपये मानधन घेतले नाही.. मिटिंग भत्ता घेतला नाही.. शेतकरी सेवा केली बाजार समितीचे उत्पन्न वाढीचे मार्ग शोधले.. व्यापाऱ्यांना शिस्त लावली.. अशा व्यक्तीच्या शोधात अजित दादा होते.. त्यांना माणूस भेटला होता आणि अजित दादांनी ठरवलं होत सभापती पद देऊ तर बाळासाहेब नाहाटा यांनाच..!

त्यामुळे जिल्ह्यात विरोध सुरू असताना आणि दिग्गज मंडळी आपल्या समर्थकांसाठी लॉबिंग करत असताना, नाहाटा यांचे पुत्र लोणी व्यंकनाथचे उपसरपंच मिथेश नाहाटा यांनी सर्व सोपस्कार पूर्ण करत, अजितदादा यांच्याशी संपर्कात राहून राज्यपातळी वरील सभापती पदावर बाळासाहेब नाहाटा विराजमान झाले.
महासंघाचे सभापती हे पणन मंडळाचे पदसिद्ध संचालक असतात.. त्यामुळे या पदावरही त्यांची निवड झाली. राज्य बाजार समिती सभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेस कोट्यात होते. विशेष म्हणजे, नाहाटा सभापती होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नव्हते. परंतु, अजित दादांची शिफारस..!
निवड झाल्यावर नाहाटा यांनी २ मागण्या केल्या.. कुकडी-घोड पुरेसे पाणी मिळावे आणि राज्यातील बाजार समित्या सक्षम करण्यासाठी मदत.. तर दुसरे वचन दिले.. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदयात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा विजय..
त्यातील एक वचन पक्षप्रवेश रूपाने पूर्ण होत आहे. तर, दुसरे वचन पूर्ण करण्यासाठी नाहाटा काय जुगाड करतात ते पाहण्याची उत्सुकता आहे. दुसरे वचनही पूर्ण करतील.. कारण, नाहाटा पॅटर्न राजकीय जुगाडाचा बादशहा आहे..!
स्त्रोत:(विशेष लेख)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!