लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. १४ जुलै २०२४ :
श्रीगोंदा शहरामध्ये दि. १३ रोजी शिवसेना उपनेते व काष्टी गावचे लोकनियुक्त सरपंच साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख विजय शेंडे यांनी केले तर सूत्रसंचालन दत्ता पाचपुते यांनी केले.
खासदार संजय राऊत यांनी कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले की श्रीगोंदा मध्ये अशा प्रकारचे संपर्क कार्यालय होईल असे मला कधी वाटले नव्हते पुढील आमदार शिवसेनेचाच होईल आणि साजन पाचपुते व राणीताई लंके एकाच गाडीमध्ये विधानसभेमध्ये पोहचाल अशा प्रकारचे वातावरण आपण गेल्या सहा महिन्यात निर्माण केले आहे. या विचार मंचावर चार लोक असे आहेत जे आमदार होणार आहेत त्यांची नावे मी घेणार नाही परंतु ते भविष्यात महाविकास आघाडीकडून आमदार होतील.
पुढचं सरकार महाविकास आघाडीचे सरकार आहे, लोकसभेला महाविकास आघाडीने ३१ जागा निवडून आणल्या. पक्ष निर्माण करणारे हयात असताना पक्ष चोरून नेले जातात राजकारणामध्ये किती खोटेपणा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची चोरी आहे. महाराष्ट्राला खोटं बोलण्याची सवय ही नरेंद्र मोदी यांनी लावली आहे अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि पन्नास वर्षे चालवली याच पक्षाला नरेंद्र मोदी नकली शिवसेना म्हणतात परंतु जनतेला सर्व माहिती आहे. नकली पाचपुते यांना बाजूला करून असली पाचपुते यांना आपल्याला आता आमदार करायचे आहे असा विश्वास त्यांनी साजन पाचपुते यांना दिला. आपले मी आभार मानतो आपण ठामपणे या तालुक्यांमध्ये कामाला लागलेला आहात परंतु आपण तालुक्यामध्ये अनेक भागांमध्ये अजून पोहोचलेला नाहीत तिथे आपल्याला पोहोचावे लागेल आणि लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील शेतकऱ्यांच्या दुधाला कांद्याला का भाव नाही हे समजून घ्यावे लागेल आता आपल्या कामाचा वेग वाढवा असा सल्लाही त्यांनी साजन पाचपुते यांना यावेळी दिला.
साजन पाचपुते यांनी आमदार व्हायची इच्छा व्यक्त करताना सांगितले माझे वडील कै. सदाशिव पाचपुते यांनी सर्वसामान्य जनतेची कामे केली त्यांच्या एका फोनने अधिकारी काम करत असत त्यामुळे त्यांचा फोन नंबर ही मी जनसेवेसाठी चालू ठेवला आहे. मला वडिलांचा आधार नसला तरी गोरगरीब जनतेचा आधार आहे. तालुक्यात फिरल्यानंतर चाळीस वर्षे आमदारकी आमच्याच घरात होती याची लाज वाटते. काष्टी गावामध्ये विकास निधी मिळत नाही कारण त्यांचा मुलगा त्या ठिकाणी पराभूत झाला परंतु लोकांनी ४० वर्षे सत्ता तुमच्याच हातात दिली होती. त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर दहा दिवसात रस्ते उखडतात नेत्यांना दहा टक्के ची अपेक्षा असते कामाच्या दर्जाबद्दल त्यांना काही देणे घेणे नाही अशी टीकाही आमदारांचे नाव नघेता केली. श्रीगोंदा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा कधी धनुष्यबाण चालला नाही आणि मशालही पेटली नाही एकदा विश्वास ठेवा आमदारच बनवून दाखवेल असा विश्वास त्यांनी संजय राऊत यांच्या जवळ बोलून दाखवला. यावेळी आढळगाव येथील रस्त्याच्या कामासाठी ५० हजार रू. रकमेचा धनादेश ग्रामस्थांकडे सुपूर्द केला.
या कार्यक्रमा वेळी अनेक कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला यामध्ये दत्तात्रय खोटे बांगर्डे सरपंच, झहीर जकाते श्रीगोंदा, यशराज जाधव निमगाव खलू, निलेश घोगरे मुंगूसगाव, सुजित इथापे, सागर माहुरकर, परेश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमासाठी सौ. राणीताई निलेश लंके, वसंत मोरे, संभाजी कदम, किरण काळे, सदाशिव धोडगे, भगवान फुलसौंदर, शरद झोडगे, जेष्ठ शिवसैनिक भाऊसाहेब गोरे, संतोष खेतमाळीस, ऋषिकेश शेलार, किरण कुरूमकर, रमेश कटारिया, टिळक भोस, एम डी शिंदे, अरविंद कापसे यांच्या सह अनेक मान्यवर मंचकावर उपस्थित होते तर असंख्य शिवसैनिकांनी या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती.
चौकट
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे राज्य आल्यापासून मुंबईला कमजोर करण्याचे प्रयत्न झाले रोजगार देणारे असंख्य उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला नेण्यात आले महाराष्ट्रातील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम यांनी केले महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी येणाऱ्या काळात महाविकास आघाडीला साथ द्या – खा.संजय राऊत