लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ३० जुलै २०२४ :
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२३ – २४ च्या खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा न दिल्यामुळे ओरियंटल इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली १ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२३ – २४ चे खरीप व रब्बी हंगाम पिकांचे पीकविमा नुकसानभरपाई २० जुलै पर्यंत खात्यावर जमा करण्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी २० जून रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय नगर येथे जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत लेखी दिले होते परंतु अद्याप नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाहीत अशा तक्रारी येत आहेत. दि ३१ जुलै पर्यंत पैसे खात्यावर जमा करण्यात यावेत अन्यथा १ ऑगस्ट २०१४ रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यालय, मे फेअर टॉवर , २८ स्पूर्ती सोसायटी, जुना मुंबई हायवे, शिवाजीनगर पुणे येथे टाळे ठोकण्याचे आंदोलन करून न्याय मागण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे निवेदन स्वतंत्र भारत पक्ष , शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी कडून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित साहेब यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन स्वतंत्र भारत पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे शेतकरी संघटना महिला आघाडीच्या सुनीता वानखेडे यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांना पिक विम्याची हक्काची रक्कम देण्यास विमा टाळाटाळ करत आहे. राज्य सरकार व विमा कमानी एक दुसऱ्यावर जवाबदारी ढकलत आहे. फक्त नगर जिल्ह्यातील लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची ११०० कोटी पेक्षा जास्त रक्कम अडकून पडली आहे. विमा कंपनी व राज्य शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी व तातडीने विमा रक्कम अदा करावी यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट, स्व.भा. पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीमाताई नारोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.