टीम लोकक्रांती : दि.९ सप्टेंबर २०२२ अनंत चतुर्दशी दिवशी गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारखे महामारीचे संकट सर्वांनी अनुभवले होते त्यामध्ये शासनाचे निर्बंध खूप कडक होते त्यामुळे दोन वर्ष गणेश उत्सव अत्यंत साध्या स्वरूपात आणि शासनाच्या निर्बंधनाचे काटेकोर पालन करून साजरा झाला. परंतु यावर्षी झालेला गणेशउत्सव हा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला गेला.
दोन वर्षापासून डीजे व्यवसायीक,ऑर्केस्ट्रा यांचे व्यवसाय ठप्प होते यंदा त्यांनाही सुगीचे दिवस आले असेच म्हणावे लागेल.पूर्वीचे गणेशोत्सव अत्यंत साध्या स्वरूपात आणि कमी खर्चात व्हायचे परंतु बदलत्या काळानुसार गणेशोत्सव बदलत गेला त्यामुळे आता बऱ्याचशा व्यवसायिकांची या गणेशोत्सवा मधून मोठी उलाढाल होत असते उत्सव चांगल्या स्वरूपाचा आणि मोठा झाल्यामुळे सर्वच ठिकाणच्या बाजारपेठे मध्ये व्यवसायाला तेजीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
शासनाचे निर्बंध शिथिल झाल्याने पुणे-मुंबई सारख्या शहरांमध्ये तसेच महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली सर्वांनीच मनमुराद आनंद लुटला. गणेश उत्सव सुरू झाल्यापासून वरून राजाची चांगलीच कृपादृष्टी झाली समाधानकारक पडलेल्या पावसामुळे शेतकरी राजाही सुखावला आहे. गणपतीचा आशीर्वाद सर्वांना लाभला आहे अशी धारणा गणेशभक्तांची झाली त्यामुळे विसर्जन मिरवणुकां मध्ये मोठा जल्लोष पहायला मिळाला.
फटाके व तोफांच्या आवाजाने शहरांना दिवाळीच्या सणाचे स्वरूप प्राप्त झाले होते. डीजेच्या तालावर आणि धोधो पडणाऱ्या पावसामध्ये सुद्धा तरुणाई चांगलीच थिरकली. गणपती सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे येणाऱ्या काळामध्ये कसलंही संकट येऊ नये अशी प्रार्थना गणेश भगक्तांनी करत, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरया अशा घोषणाबाजी करत आनंदी वातावरणात गणेश विसर्जन करण्यात आले. पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांचे काटेकोर नियोजन करत कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता चोख बंदोबस्त पार पडला.
स्त्रोत:(संपादकीय)