शेतकरी बांधवांच्या हितासाठी, त्यांच्या फायद्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील आहे – अजित पवार
अहमदपूर, ता. १० : अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. आयोजित शेतकरी मेळाव्याला अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आम्ही राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहा जिल्ह्यांमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम काल पंतप्रधानांच्या हस्ते झाला, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. माझ्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी, त्यांच्या फायद्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील आहे. लाखांचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला वीज बिल माफी दिली. एक रुपयात पीक विमा दिला. दुधावर प्रतिलिटर ५ ऐवजी ७ रुपयांचा अनुदान देऊ केला. अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघाचा विकास करून घेऊयात. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी भक्कम उभं रहा, असं आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.