नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी हेमंत नलगे यांच्याशी चर्चा करून त्यांचे मन आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले.
श्रीगोंदा, ता. १० : कोळगाव परिसरातील मोठे नेतृत्व असलेल्या हेमंत नलगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या सोबत प्रचार प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने नागवडे यांना पाठबळ मिळून जगताप यांना थेट धक्का बसला आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कोळगाव मध्ये पाचपुते, नागवडे व जगताप यांचे सारखेच प्राबल्य आहे. कोळगाव मध्ये दहा हजाराच्या आसपास मतदान असल्याने सर्व राजकीय नेत्यांचा कोळगाव मधील मतदारांना आकर्षित करण्याकरता नेहमीच ओढा असतो. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रथमच पाचपुते, नागवडे व जगताप आमने सामने उभे राहिल्याने नागवडे व जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्या नेत्यांचे काम करावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
हेमंत नलगे यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने कार्यकर्ते संभ्रमाअवस्थेत होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जगताप व नागवडे यांनी हेमंत नलगे आणि सरपंच पुरुषोत्तम लगड या दोन्ही गटांना मदत केल्याचे बोलले जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता हातची गेल्याने हेमंत नलगे हे या दोन्ही नेत्यांवर नाराज असल्याचे जाणवत होते. गेल्या तीन-चार दिवसापासून राजेंद्र नागवडे मात्र हेमंत नलगे यांचे मन वळवण्यात पुढाकार घेत होते. अखेर हेमंत नलगे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून कोणता निर्णय घ्यावा याबाबत कल जाणून घेतला. यात काही कार्यकर्त्यांनी राहुल जगताप यांच्या सोबत जावे, तर काही कार्यकर्त्यांनी अनुराधा नागवडे यांच्या सोबत असावे असा पर्याय सुचविला.
तद्नंतर मात्र नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी हेमंत नलगे यांच्याशी चर्चा करून त्यांचे मन आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. महाविकास आघाडीच्या तिकिटामुळे राजकीय प्राबल्य वाढलेल्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्यासोबत या निवडणुकीत राहण्याचा आपण निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हेमंत नलगे यांच्या निर्णयामुळे जगताप गटाला मात्र खिंडार पडले आहे. आजपर्यंत नागवडे आणि जगताप यांचे कार्यकर्ते एकत्रितरित्या हेमंत नलगे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, पण आता हेमंत नलगे यांनी नागवडे यांना पाठिंबा दिल्याने उर्वरित जगताप समर्थकांनी मात्र तातडीने बैठक घेऊन आपण राहुल जगताप यांचाच प्रचार करायचा असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगताप यांच्या मतात मोठे विभाजन झाले असले तरी नागवडे यांची कोळगावात ताकद वाढल्याचे दिसत आहे.