महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ श्रीगोंदा तालुक्याच्या लेखाजोख्यातून टाकला सरकारी योजनांच्या कामांवर प्रकाश
श्रीगोंदा, ता. ५ : महाराष्ट्र राज्य शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करून उत्कृष्ट रस्ते बनवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असते परंतु त्याची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने होत नाही. श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ते टाकळी लोणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चालू असलेला रस्ता किमान ८ महिन्यापासून दिरंगाई ,निकृष्ट पद्धतीने मनमानीने केला जात असून या रस्त्याची सखोल चौकशी आणि कार्यवाही करावी अन्यथा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय अहमदनगर येथे सोमवार दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता बेमुदत संबळ बजाव धरणे आंदोलन करण्याचा इशारा आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी (महसूल) शारदा जाधव यांना दिले असून संबंधित मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अहिल्या नगर कार्यालय, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, ते वरिष्ठ स्तरापर्यंत निवेदने मोहीम राबवली असून तात्काळ कारवाई होत नसेल तर संबंधित विभाग व ठेकेदार यांना जाग येण्यासाठी आणि कठोर कारवाई करण्यासाठी बेमुदत आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी जय हिंद माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष मेजर नीलकंठ उल्हारे , त्रिदलचे मेजर संजय मस्के, मेजर मारुती ताकपेरे, मेजर गोवर्धन गर्जे आदीसैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर काम हे ८ कोटी ५० लाख रुपयाचे असून किमान ८ महिन्यापासून दिरंगाईने व निकृष्ट पद्धतीने चालू आहे काम इस्टिमेट प्रमाणे होत नसून संबंधित विभागाचे याकडे लक्ष नसल्यामुळे ठेकेदाराची मनमानी चालू आहे. तांदळी दुमाला येथील जंजाळी नदीवरील पूल हा तकलादु पद्धतीने केला असुन तो इस्टिमेट मध्ये आहे किंवा नाही याची सुद्धा चौकशीची मागणी करताना पंचक्रोशीतील नागरिकांनी भयंकर संताप व्यक्त केलेला आहे.
सदर रोड आढळगाव मुख्य रस्त्याला जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असून यावर पंचक्रोशीतील नागरिकांची कायम रहदारी असते तसेच पर्यायी ऊस उत्पादकांना ऊस वाहतुकीचा आवश्यक मार्ग आहे पण या रोडचे निकृष्ट दर्जाने काम होत असल्याने आणि पावसाळ्यात तर भयंकर गैरसोय होत अपघाताची मालिकाच घडत असल्याने कायमच दमकोंडी सबब येथील नागरिकांचा संयम सुटला असून या संबळ बजाव बेमुदत आंदोलनात तांदळी दुमाला गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ सोसायटी चेअरमन,व्हा. चेअरमन संचालक मंडळ आदी ग्रामस्थ समवेत सैनिक संघटना, आधुनिक लहूजी संघटनेचे पोपट फुले, हिराबाई गोरखे, दत्तात्रय गोरखे ,मल्हारी खुडे ,अजय शिंदे ,आबासाहेब तोरडमल, दत्तात्रय गणपत गोरखे, कैलास लोखंडे, राजू लोखंडे, लक्ष्मण जगताप,किशोर गाडे, सचिन गायकवाड ,युवराज ससाने ,शंकर ससाने आदी पदाधिकारी सक्रिय राहून बेमुदत आंदोलन करणार आहेत.