श्रीगोंदा, ता. १७ : तालुक्यातील आढळगाव मधून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी च्या कामातील दिरंगाई आणि होत असलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात आढळगाव ग्रामस्थांनी आज सकाळी १० वाजता बस स्थानका समोर आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत सरपंच शिवप्रसाद उबाळे करत असून, संपूर्ण गावाच्या सहकार्याने हे आंदोलन सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. परिणामी, धुळीच्या त्रासामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासोबतच, पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाइन तुटल्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे या समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यामध्ये प्रमुख मागण्या खालील प्रमाणे केल्या आहेत.
१. राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम त्वरित चालू करावे आणि विनाअडथळा पूर्ण करावे.
२. महामार्गाच्या धुळीमुळे होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून रोज टँकरने पाणी मारावे.
३. महामार्गाचे काम ३० मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन द्यावे.
४. आढळगाव ग्रामपंचायतच्या तुटलेल्या पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून नवीन पाईपलाईन टाकावी.
५. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा आणि जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करावी.
६. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओटा, बस स्टँड, तुकाई माता मंदिर, लक्ष्मी माता मंदिर, पथदिवे आणि हायस्कूलच्या ओव्हरब्रिजचे काम त्वरित सुरू करावे.
या आंदोलनात ज्येष्ठ नेते शहाजी बापू वाकडे, माजी सभापती विलासराव भैलुमे, ह भ प हनुमंत गिरमकर, हनुमंत डोके, सत्यवान शिंदे, अंबादास चव्हाण, नानाभाऊ बोळगे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने या मागण्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास संघर्ष अधिक तीव्र केला जाईल. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, जबाबदार अधिकाऱ्यांनी तत्काळ लेखी हमी न दिल्यास उपोषण मागे घेतले जाणार नाही.