श्रीगोंदा, ता. १८ : तालुक्यात उदयाला आलेल्या शिक्षण सम्राट आणि साखर सम्राटांचे काय काय उद्योग चालतात याचा लेखाजोखा संभाजी ब्रिगेडकडे आहे. त्यामुळे माझ्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला तालुक्यातील राजकीय मंडळीनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना वठणीवर आणण्याची धमक संभाजी ब्रिगेडमध्ये आहे कार्यकर्त्याने संघटन वाढीसाठी जोमाने कामाला लागा असे वक्तव्य अहिल्यानगर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी केले.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक श्रीगोंदा संपर्क कार्यालय येथे पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम कोरडे, तालुकाध्यक्ष सचिन काकडे (पारनेर), वैभव लाळगे (कर्जत), सुरज कराळे (नगर) आदि पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. माजी शहराध्यक्ष राजू मोटे व माजी तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड यांनी बैठकीसाठी उपस्थिती दर्शवत पुन्हा एकदा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली. सर्वांना सोबत घेवून आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात उमेदवार चाचपणी करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष शाम जरे कार्यकर्त्यांना काम करताना येणाऱ्या समस्या मांडताना म्हणाले की, कार्यकर्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले तरच कार्यकर्ता टिकेल अन्यथा कार्यकर्ता प्रवाहातून बाहेर जाईल; काही कार्यकर्त्यांना तालुक्यामध्ये काम करत असताना जाणीवपूर्वक इतर पक्षांकडून त्रास दिला जातो त्यामुळे त्यांना संघटनेच्या वतीने पाठबळ देणे गरजेचे आहे. यावर आक्रमक होत या पुढच्या काळात असं काही होणार नाही जो तालुक्यातील राजकीय नेता कार्यकर्त्याला त्रास देईल त्याचा बंदोबस्त करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करण्यास समर्थ आहे मागील विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यासह राज्यातील राजकारण भाजपने गारद केले आहे. अनेक राजकारणी उभारी मिळण्याच्या आशेने पक्ष नेतृत्वाकडे पाहत असताना भाजपच्या विरोधात बोलायला कोणी तयार नाही. संभाजी ब्रिगेड ही विचारांची आक्रमक संघटना असून प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता लढावू बाणा जपून असल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वाटेला सहजासहजी कोणी जात नाही.
राजकारणाच्या वेळी राजकारण आम्ही करूच मात्र माझ्या कार्यकर्त्याला अडचणीत असणाऱ्या प्रवृत्तीचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाभर गाव तेथे कार्यकर्ता हे अभियान राबवण्यात येणार असून जुन्या नव्या कार्यकर्त्यांना बळ देण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेवून त्या तातडीने दूर करण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले. युवा तालुकाध्यक्ष पदी सुहास गाडेकर, शहराध्यक्ष पदी सुहास होले आणि तालुका संघटक पदी संदिप जगताप व संतोष जावळे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष परकाळे यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शाम जरे यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राऊत यांनी मानले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळूंज, तालुका उपाध्यक्ष दिलीप लबडे, उत्तम घोगरे, निलेश कुरुमकर, समीर शिंदे, आदि मान्यवर उपस्थित होते.