सात दिवसात श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचा पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास तीव् आमरण उपोषण करणार- दरेकर
श्रीगोंदा, दि. २५ मार्च २०२५ : तालुक्यात कुकडीचे पाणी न मिळाल्यामुळे वंचित लाभधारक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली २४ मार्चपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन तबबल ३५ दिवस सुरू असताना” पाणी उशाला मात्र कोरड घशाला” अशी स्थिती श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभधारक शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे. दरम्यान कुकडी कालव्याचे आवर्तन १६ फेब्रुवारी रोजी सुरू झालेले असताना श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत १६ मार्चपासून पाणी देण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये डी वाय १२; १३ आणि १४ तसेच चोराचीवाडी; लिंपणगाव; वेळू; आढळगाव इत्यादी वितरिकेंच्या लाभ क्षेत्रातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या पिकाला पाणीच मिळाले नाही. मात्र चाऱ्या बंद झालेल्या आहेत. नेहमीप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय या आवर्तनाच्या निमित्ताने झालेला असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे.
नेहमीप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांवरती खूप मोठा अन्याय या आवर्तनाच्या निमित्ताने झालेला आहे. वरील भागात देखील पाणी देत असताना शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्याऐवजी काल मर्यादेचे बंधन घालत एवढ्याच वेळात सिंचन आटोपले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेऊन शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचा जलसंपदा विभागाकडून प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे करोड रुपयाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचा दावा तालुका अध्यक्ष दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान या आंदोलन स्थळी तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे व कुकडीचे कार्यकारी अभियंता घोरपडे यावेळी आंदोलन स्थळी उपस्थित होते. तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे यांनी कार्यकारी अभियंतांना शेतकऱ्यांच्या पाणी मागणीचा प्रस्ताव तात्काळ तयार करून डेड स्टॉक मधून पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी कार्यकारी अभियंता यांना केल्या. तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी सात दिवसात आम्ही कार्यकारी अभियंत्यांच्या प्रस्तावाची वाट पाहणार आहोत. तोपर्यंत वंचित लाभधारक शेतकऱ्यांचे आमरण उपोषण ही कायम ठेवणार असल्याचे यावेळी सांगितले.
दरेकर यांनी आणखी पुढे म्हटले आहे की; ज्या चाऱ्यांना पाणी मिळाले नाही; त्या वितरिकांचे पंचनामे करा मगच खरी परिस्थिती शेतकऱ्यांची दिसून येणार आहे. केवळ एका आवर्तनाअभावी शेतकऱ्यांचे कोट्यावधीचें नुकसान झाले. त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल देखील दरेकर यांनी केला आहे. श्रीगोंदे तालुक्यात कुकडीचे पाणी न मिळण्यामागे कार्यकारी अभियंताच जबाबदार असल्याचा आरोप देखील दरेकर यांनी केला आहे. श्रीगोंदेकरांचे पाणी नेमके गेले कुठे? असा सवाल उपस्थित करत दरेकर यांनी आणखी पुढे म्हटले आहे की; सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून तालुक्यातील शेतकरी त्यांच्या विहिरीत बोरवेलला उपलब्ध असणारे पाणी शेतात उभ्या असणारे पिकांना देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना महावितरण कंपनीने देखील गलथान व अनागोंदी कारभार सुरू केला आहे. विजेचा देखील अनियमिता दिसून येत आहे. वीज आली तर अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा व विजेचा लपंडाव यामुळे शेतकरी मेटाकुटला आल्याचे दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. या आंदोलन स्थळी कुकडी लाभ क्षेत्रातील वंचित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.