टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी दि.२२ सप्टेंबर २०२२: कांद्याच्या भावा संदर्भात केंद्र व राज्य सरकार निर्णय घेत नाहीत, गेल्या पाच सहा महिन्यापासून कांदा वखारीत सडून जात आहे कांद्याला भाव वाढून मिळत नाही . व्यापारी कांदा सहा ते सात रुपयांनी मागणी करतात. या बाजारभावात कांदा शेतकऱ्यांना विकण्यासाठी परवडत नाही. त्यामुळे किमान ३० रुपये दर प्रति किलोला द्यावा, या मागणीसाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण बसणार आहेत. अशी माहिती कांदा उत्पादक शेतकरी पोपटराव संभाजी माने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या प्रश्नाबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार व संबंधितांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याला मिळणारे कांदा बाजार भाव हे उत्पादन खर्च पेक्षा खूपच कमी असून शेतकऱ्याला न परवडणारे आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही. सरकारने कांदा बाजार भावात हस्तक्षेप करून किमान ३० रुपये प्रति किलो प्रमाणे कांद्याला भाव वाढवून द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून, पुढे या निवेदनात आणखी म्हटले आहे की, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व शेतकरी व शेती अडचणीत आलेली असून, साठवण केलेला कांदा पन्नास टक्के पेक्षा जास्त खराब झाल्याने सरकारने याबाबत विचार करून न्याय द्यावा. या प्रश्नाबाबत सरकारने येत्या तीन ते चार दिवसांमध्ये योग्य तो निर्णय घेतला नाही, तर श्रीगोंदा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषण दरम्यान काही अनर्थ घडल्यास त्यास सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत आळेफाटा येथील वडगाव आनंदच्या रानमळा येथील शेतकरी दशरथ केदारी या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व शेतीमालास कमी बाजार मिळत असल्यामुळे कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. आता यापुढे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणखी किती शेतकऱ्यांना आपला जीव कामावर लागेल. हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. श्रीगोंदाच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर कांदा उत्पादक शेतकरी पोपटराव माने, जयसिंग शेंडे, दत्तात्रय गिरमकर, लिंपणगावचे उपसरपंच अरविंद कुरुमकर, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक शरद राव कुरुमकर , वाणी दीपक कस्तुर, नंदकुमार ठोमस्कार ,निले्श कुरुमकर, आप्पासो श्रीराम, ग्रामपंचायत सदस्य संदीप कुरुमकर, दादासाहेब लगड ,आदींसह अन्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
त्या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, विरोधी पक्षनेते, खासदार, आमदार ,जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा, तहसीलदार आदींना पाठवले आहेत.
स्त्रोत:(नंदकुमार कुरुमकर)