टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि. ८ ऑक्टोबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव, शेंडगेवाडी आणि होलेवाडी परिसरातून जाणाऱ्या नाव्हरा – इनामगाव -काष्टी – श्रीगोंदा – जळगाव – जामखेड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी मुळे येथील नागरिकांना भलतेच त्रस्त होत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला ड्रेनेज लाईन नसल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहत आहे. तर, काहींच्या घरांमध्येही पाणी शिरत आहे. रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडे नसल्याकारणाने मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता येथे निर्माण झालेली आहे. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नमूद गावातील नागरिक श्रीगोंदा तहसील कार्यासमोर या सह मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषणासाठी बसले होते.आज या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. निलेश कल्याण कुरुमकर, विजय शेंडगे सह नमूद परिसरातील ग्रामस्थ आंदोलनास बसले असताना, ठोस मार्ग यातून निघत नसल्याचे दिसत होते. मात्र, जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ व पंचायत समिती सदस्या तसेच विद्यमान उपसरपंच, आढळगाव अनुराधाताई ठवाळ तसेच श्रीगोंद्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या मध्यस्थीने राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अहमदनगर चे शाखा अभियंता श्रीयुक्त काळे यांच्यासमोर नमूद मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.
यातून मार्ग निघत काळे यांनी आज उपोषण सुटल्यानंतर लगेच लिंपणगाव, होलेवाडी व शेंडगेवस्ती परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी लगतचे पावसाचे पाणी काढून देण्याचे काम जेसीबीच्या साह्याने चारी काढून तसेच सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग लगत जोडणाऱ्या रस्त्यांचे ठिकाणी सिमेंट पाईप टाकून करण्यात येणार असल्याचे तसेच उपोषणकर्त्यांनी नमूद केलेल्या मागण्या याद्वारे पूर्ण करण्यात येत आहेत. असे लेखी पत्र दिल्यानंतर नमूद उपोषण मागे घेण्यात आले.
स्त्रोत:(आंदोलन)