टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१९ ऑक्टोबर २०२२ : चालू वर्षी पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही या पावसाळी हंगामात फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून चालु ऑक्टोबर महिन्यात तर पावसाने कहर केला आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे अर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनातर्फे तातडीने सरसकट शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, “जून महिन्यात सतत पाऊस पडला असून आजपर्यंत श्रीगोंद्यात सरासरी १५७ टक्के पाऊस पडला आहे. ऑक्टोबर महिन्यातही अतिवृष्टी झाली असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील हातात तोंडाला आलेली पिके सडून गेली असून उर्वरित पिके ही आता राहणार नाहीत. अतिवृष्टी मुळे अजून काही महिने शेतात शेतकऱ्याला जात आहे येणार नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे.
या अस्मानी संकटामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा देऊन बाहेर काढणे शासनाची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीगोंदा तालुका च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल” असे म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिदास शिर्के, संजय आनंदकर, सतीश जामदार, मीनल भिंताडे, संदीप उमाप, भाऊसाहेब खेतमाळीस, सुनील पाचपुते आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्त्रोत:(निवेदन व प्रसिध्दी पत्र)