टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२८ जानेवारी २०२३ : दि. २४ जानेवारी रोजी गाडीला कट लागल्याच्या कारणावरून वाद सुरू होऊन त्याचे मोठ्या वादात रुपांतर झाले. श्रीगोंदा शहरात दहशत माजवत एका टोळीने दोन युवकांवर हल्ला करुन जबर मारहाण केली. तसेच महाविद्यालयीन तरुणींना जाणीवपुर्वत त्रास देणे, दुचाकीवरुन कट मारुन वाद घालणारी नशेखोर, टुकार तरूणांची टोळी श्रीगोंदा शहराचे सामाजिक वातावरण दूषित करुन दहशत पसरवत आहेत. संघटित गुन्हेगारांची ही टोळी उध्वस्त करणेसाठी, श्रीगोंदा पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी व संघटित गुन्हेगारी विरोध कायदा मोक्का अंतर्गत कठोर कारवारी करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवार दि. २७ रोजी श्रीगोंदा शहर कडकडीत बंद ठेवत, सकाळी ११ वा. श्रीगोंदा बस स्थानकापासून मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये हजारोंच्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते.
मोर्चा श्रीगोंदा तहसिल कचेरीच्या प्रागंणात आल्यानंतर मोर्चाचे जाहिर निषेध सभेत रुपांतर झाले. या सभेत श्रीगोंदा शहरातील अवैद्यधंदे बंद करावे, नशेचे रॅकेट चालवणाऱ्यावर, संघटित गुन्हेगारी विरोध कायदा मोकका अंतर्गत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व अतिक्रमणीत टपऱ्या काढण्यात याव्यात अशी मागणी सर्वांनी केली.
माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते, माजी आ. राहुल जगताप, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सभापती बाळासाहेब नाहाटा,प्रा. बळे सर,माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, बापूशेठ गोरे, टिळक भोस, सुनिल वाळके, संतोष इथापे, संतोष खेतमाळी, पोपट खेतमाळीस, गोपाळ मोटे, मंगेश शिंदे यांची भाषणे झाली.
यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.पोलीस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या कडून श्रीगोंदा शहरात, मोर्चा व सभे ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लोकक्रांती वृत्तांकन