लोकक्रांती ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व अजित पवार यांचे विश्वासु समजले जाणारे घनश्याम शेलार यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत दि. १४ जुन रोजी आपल्या विश्वासु सहकाऱ्यांबरोबर भेट घेऊन पक्षप्रवेश केला. घनश्याम शेलार यांचे राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचे कारण म्हणजे आगामी विधानसभेसाठी त्यांना डावलले जाण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीच्या वरीष्ठांकडुन मिळाल्याचे खात्रीलायक सुत्रांकडुन समजते. आपण पक्षासाठी केलेल्या कष्टांची किंमत पक्षाला नसल्यामुळे नाराज झालेले शेलार बीआरएस पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणने आहे.
मागील अनेक वर्षांचे तालुक्याचे राजकारण पाहीले तर श्रीगोंदा तालुक्यातील बरेच नेते या पक्षातून त्या पक्षात जात असताना घनश्याम शेजार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. १९९९ ला खासदारकी हुकल्यानंतर शरद पवार साहेब स्वताः त्यांच्या घरी जाऊन त्यांचा राष्ष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून ते शरद पवार व अजित पवार यांचे विश्वासु म्हणुन ओळखले जात होते. जिल्हाध्यक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे काम त्यांनी केले. मरेपर्यंत राष्ट्रवादीत राहणार असेही ते एकवेळ म्हणाले होते परंतु प्रत्येक वेळी महत्वाची पदे त्यांना डावलून तालुक्यातील इतर नेत्यांना दिले जातात असा त्यांचा आरोप आहे. राष्ट्रवादी कडून अन्याय झाल्याची त्यांची भावना उघड दिसत होती. त्यांनी तालुक्यात काढलेल्या जनसंवाद यात्रेच्या समारोपात पवार कुटुंबीयातील नेत्यांना तारखा मिळत नसल्याने त्यांनी वारंवार शेलार यांच्या कार्यक्रमास तालुक्यात येण्याचे टाळलेले दिसुन येत होते.
एक अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे तळागाळातील जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. गेल्या विधान सभेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला श्रीगोंदा तालुक्यात उमेदवार मिळत नव्हता त्यावेळेस घनश्याम शेलार यांनी उमेदवारी केली आणि त्यांना निसटता पराभवाशी सामना करावा लागला पराभव होऊनही त्यांनी चार वर्षे राष्ट्रवादी बरोबर एकनिष्ठ राहून तालुका पिंजून काढला गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. हे करत असताना त्यांना बळ देण्याऐवजी राहुल जगताप यांना रयत शिक्षण संस्थेमधे महत्त्वाच्या पदावर घेवुन शेलार यांना एकप्रकारे थांबण्याचे संकेत पक्षाने दिल्याचे दिसत होते.
आता त्यांच्या सारखा जेष्ठ नेता गेल्याने बी आर एस नगर जिल्ह्यात मुसंडी मारणार का? आता बी आर एस पक्षाकडून त्यांना न्याय मिळणार का ? बीआरएस पक्षाचे शेतकऱ्यासाठी असलेली धोरणे आणि शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या सरकारी योजना महाराष्ट्रात प्रभाव पडणार का? घनश्याम शेलार यांना या पक्षांमध्ये कितपत न्याय मिळेल ? महत्त्वाच्या पदापर्यंत ते पोहोचणार का हा येणारा काळच ठरवेल.