लोकक्रांती ऑनलाइन
श्रीगोंदा दि.६ जुलै २०२३ : कोणी काही अपप्रचार करु द्या. माझी बांधिलकी सामान्य जनतेशीच आहे.त्याच जोरावर आगामी विधानसभा निवडणूक आपण सर्व ताकदीनिशी लढविणार आहोत. सामान्य जनतेच्या भक्कम पाठबळावर व विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक जिंकूच असे ठाम प्रतिपादन भारत राष्ट्र समितीत प्रवेश केलेले नेते घन:शाम शेलार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले आहे. याच बैठकीत त्यांनी आपण श्रीगोंदा-नगरची जागा तर हमखास जिंकूच पण राज्यातही भारत राष्ट्र समितीचे सरकार येण्यासाठी राज्यभर कार्यरत राहू असे त्यांनी सांगितले.
मागील पंधरवाड्यात समर्थकांसह भारत राष्ट्र समितीत प्रवेश केलेल्या घन:शाम शेलार यांनी आज श्रीगोंद्यात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, राज्यातील सध्याचे राजकारण दूषित झाले आहे. येथे सध्या कार्यरत असलेल्या कोणत्याच पक्षाला व प्रमुख नेत्यांना जनतेशी , जनतेच्या समस्यांशी काही घेणे देणे नाही. हे सर्वजण केवळ सत्तामग्न नेते असून स्वविकासालाच ते प्राधान्य देत आहेत.याउलट भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केवळ ९ वर्षाच्या सत्ताकाळात राज्याचा विकासात्मक कायापालट करुन ख-या अर्थाने बळीचे राज्य साकारले आहे. त्यांची सामान्य जनता व विकासाशी बांधिलकी असून सामान्य माणसांचा बारीक सारीक विचार करणारे जनहिताशी सरकार ते चालवित आहेत. शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा, पाणी, रस्ते,उद्योग अशा सर्वच बाबतीत तेलंगणा सरकारने आदर्शवत व अनुकरणीय कामगीरी केवळ नऊ वर्षात केलेली आहे.
मतदारसंघातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व येथील विकासकामांचा बॅकलॅाग भरून काढण्याच्या निर्धारानेच आपण आगामी विधानसभा निवडणूकीत सर्व शक्तिनीशी उतरणार आहोत. जनतेच्या पाठबळावर व आशिर्वादाने आपण श्रीगोंदा-नगरची जागा जिंकूच असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले की, राज्यात भारत राष्ट्र समितीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी राज्यभर कार्यरत राहणार आहे.कार्यकर्ते व शेतक-यांना तेलंगणा सरकारने केलेला विकास व तेथील दर्जेदार कामे दाखविण्यासाठी पुढील महिन्यात मतदारसंघातील जवळपास एक हजार शेतकरी, कार्यकर्ते यांचा तेलंगणाचा अभ्यास दौरा आयोजित करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी शेलार यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश करण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. या बैठकीत कार्यकर्त्यांनी तालुक्यातील साखर कारखानदारांना टिकेचे लक्ष्य केले.शेतकरी,कामगार व वहातुकदार यांना जाणिवपूर्वक अडचणीत आणून त्यांचे शोषण केले जात असल्याची गंभीर व टोकाची टीका केली.या बैठकीच्या वेळी राज्यात दमदार पाऊस व्हावा यासाठी चौधरी काकांच्या नेतृत्वाखाली पर्जन्यसुक्ताचे पाठ घेण्यात आले.
यावेळी प्रा. संजय आनंदकर, अझीम जकाते, महेंद्र गायकवाड, श्रीपाद ख्रिस्ती, रामभाऊ रायकर, आप्पासाहेब शेटे, राजेंद्र काकडे, प्रा. विजय पाटील, डॅा. अनिल कोकाटे, विक्रम शेळके यांची भाषणे झाली. शाम जरे यांनी प्रास्ताविक केले तर गोरख घोडके यांनी आभार मानले. या बैठकीला जवळपास ३३०-३५० प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
जमिन जुमला विका पण विधानसभा लढाच..!
या बैठकीत बोलताना प्रा.विजय पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत शेलार यांच्या उमेदवारीबद्दल विरोधक वेगवेगळ्या चर्चा करुन अफवा पसरवित असल्याचे सांगतानाच “आण्णा , आता यावेळी कोणत्याच परिस्थितीत माघार घ्यायची नाही. पैसे आम्हीही देवूच पण तरीही पैसे कमीच पडले तर जमिन जुमला विका पण ही विधानसभा लढाच.आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.त्यांच्या वक्तव्यावर बैठकीत टाळ्यांचा कडकडाट झाला.