सत्तेवर आल्यानंतर जीवनआवश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार; जाहिरात बाजी न करता लाडक्या बहिणींना आम्ही ३ हजार देऊन सुरक्षा वाढवणार त्यासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन तयार करून त्यात सर्व महिला कर्मचारी असतील त्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार कमी होतील – उद्धव ठाकरे
श्रीगोंदा, ता. १४ : ज्यांना चाळीस वर्ष तालुक्यातील जनतेने आमदार केले त्यांनी मात्र तालुक्याचे वाळवंट केले. महाविकास आघाडी कडून आम्ही साजन पाचपुते यांच्यासाठी मतदार संघ निवडला परंतु साजन पाचपुतेंनी मनाचा मोठेपणा दाखवून अनुराधाताई नागवडेंना आघाडी कडून उमेदवारी द्या असे सांगितले. आता सहकार महर्षी बापूंचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधा नागवडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विधानसभेत पाठवा. निश्चितपणे विकास काय असतो तो आम्ही दाखवून देऊ असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीगोंदा येथील प्रचार सभेमध्ये केले.
श्रीगोंदा – नगर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथे शेख महंमद महाराजांच्या पटांगणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितीत मतदारांसमोर बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की श्रीगोंदा तालुक्याचा विकास साधताना सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी खऱ्या अर्थाने आपले भरीव योगदान देऊन सर्वांगीण विकास साधला परंतु श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधींनी गेले ३५ ते ४० वर्ष श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला विविध आमिषे दाखवत सत्ता हस्तगत केली, त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याची अधोगतीच राहिली. श्रीगोंद्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आता गाफील न राहता महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.अनुराधाताई नागवडे यांना निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो. असे आवाहन शिवसेनाप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीगोंदा येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले.
वास्तविक पाहता नागवडे कुटुंबाचा श्रीगोंदा तालुक्याच्या विकासात मोठा त्याग आहे. मागील २०१९ ला साजनचे वडील सदाशिव अण्णा पाचपुते यांनी नागवडे कुटुंबांना २०२४ ला आम्ही तुम्हाला मदत करू तो शब्द साजन पाचपुते यांनी पाळला. भाजप सरकारवर सडकून टीका करताना म्हटले आहे की मोदी शहा यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलावे. आमच्यावर टीका करताना भान ठेवावे. याउलट महाराष्ट्रातील अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारचे फोडाफोडीचे राजकारण करून गद्दारांना व भ्रष्टाचारी वृत्तींना सत्तेवर बसवले. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या घोषणा सुरू केल्या. परंतु राज्यातील जनता सुज्ञ आहे. कदापिही या घोषणांना बळी पडणार नाही. आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी जात असताना आमच्या बॅगा निवडणूक यंत्रणेकडून तपासल्या जातात. मग पंतप्रधान राज्यात प्रचारासाठी जात असताना त्यांच्या का बॅगा तपासल्या जात नाही असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान हे स्वार्थासाठी मिरवतात. तर राज्यातील भाजपच नेते हे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊ नये म्हणून बंडखोरांना पाठबळ देतात. परंतु जनतेने देखील या भाजपावाल्यांचे कारनामे ओळखले आहेत. ठाकरे आणखी पुढे म्हणाले की; भाजपचे नेते राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी ईडीचा धाक दाखवतात. आणि पक्षात आल्यानंतर कारखानदारांची पाठराखण करतात. साठ वर्षात नागवडे कारखान्याचा कारभार तपासा आणि विरोधकांचे पंधरा वर्षातील कारखान्यांची अवस्था पहा. नागवडेंनी सहकार चळवळ मोठ्या संघर्षातून उभी करून कष्टकरी शेतकरी यांना न्याय देण्याची सतत भूमिका घेतली. म्हणूनच या कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. शेतकरी ऊस उत्पादकांचा देखील नागवडेंवर विश्वास आहे असंही ठाकरे म्हणाले.
आम्ही सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षे जीवनआवश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहोत. श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न डिंबे माणिक डोह साकळाई योजनेचे काम प्रथम हाती घेणार आहोत असे आश्वासन दिले. मागील अडीच वर्षांपूर्वी आम्ही सत्तेवर होतो. तेव्हा दोन लाखापर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ केले. आता पुन्हा २०२४ ला सत्तेवर येताच शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंतची कर्ज माफ करणार आहोत तर लाडक्या बहिणींसाठी प्रति महिना तीन हजार रुपये देऊ यासह महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याची पूर्तता करणार आहोत. भाजपवर टीकास्त्र सोडत अडीच वर्षाच्या कालावधीत भाजप सरकारने राज्यातील उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले. दुसरीकडे मात्र महाराष्ट्राच्या विकासाचा कळवा आणायचा ही वृत्ती आता सर्वांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत गाडून टाकायची आहे. विकासाच्या गॅरंटीचा महाराष्ट्र हे फक्त महाविकास आघाडीचे सरकारच करू शकते. असे सांगून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.
सभेवेळी अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली यामध्ये उमेदवार अनुराधा नागावडे, मा.खा.फौजीया खान, घनशाम शेलार, बाबासाहेब भोस, शेख सुभानअली, सुनंदाकाकी पाचपुते, संतोष इथापे,राजा राजापूरकर, संतोष खेतमाळीस, अतिक कुरेशी, मुकुंद सोनटक्के, सुशांत लोखंडे, माऊली हिरवे, अरविंद कापसे, बाळासाहेब नलगे, शरद पवार, ऋषिकेश गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी बोलताना सांगितले की सहकार महर्षी व श्रीगोंद्याचे भाग्यविधाते शिवाजीराव नागवडे बापू हेच खरे तालुक्याचे कणखर व विकासाभिमुख नेतृत्व होते. सर्वसामान्यांचा सतत ध्यास घेणारे हे नागवडे कुटुंब अत्यंत प्रामाणिकपणे तालुक्याचे प्रश्न मार्गी लावतात सहकार महर्षी बापूंचा वारसा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे महाविकास आघाडीचे उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे, दीपक शेठ नागवडे हे कणखरपणे चालवत आहेत. सौ नागवडे या शिवसेनेच्या उमेदवार असल्या तरी महाविकास आघाडीचा धर्म सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. श्रीगोंदा तालुक्यात ज्यांना चाळीस वर्षे आमदार केले. त्यांनी मात्र तालुक्याच्या विकासात लक्ष दिले नाही. स्वतःची प्रगती साधली तालुक्यातील अनेक प्रलंबीत रस्ते, विज, पाणी या प्रश्नासाठी प्रत्येक वेळी तालुक्यातील जनतेला आंदोलन करावे लागते. मग हा विकास साधला कुठे?याचे उत्तर मात्र लोकप्रतिनिधींनी द्यायला हवे. काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. तालुक्याच्या प्रश्नावर सतत संघर्ष करतात सौ अनुराधाताई नागवडे यांना निवडून आणण्यासाठी ते सक्रिय होऊन प्रयत्नांची पराकष्टा करणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेने कुठलीही शंका घेण्याची गरज नाही. निश्चितपणे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधा नागवडे या सर्वांच्या पाठबळावर प्रचंड मतांनी निवडून येतील अशी ग्वाही देखील माजी मंत्री थोरात यांनी यावेळी बोलताना दिली.
सभेला मंचकावर प्रमुख उपस्थिती मिलिंद नार्वेकर, मा.खा.फौजीया खान, सुनंदाकाकी पाचपुते, शशिकांत गाडे सर, बाबासाहेब भोस, दिपकशेठ नागवडे, साजन पाचपुते, भाऊसाहेब गोरे, राजेंद्र नागवडे, जयंत वाघ, शेख सुभानअली, सुनीता शिंदे,संगीता मखरे, बाळासाहेब दुतारे, विजय शेंडे, संपतराव म्हस्के, अनिल वीर,संजय आनंदकर, प्रशांत दरेकर, सतीश मखरे, बाबासाहेब गुंजाळ,डीडी घोरपडे आदींसह नगर – श्रीगोंदा मतदारसंघाती व तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी केले. आभार शिवसेनेचे उपनेते साजनभैय्या पाचपुते यांनी मानले.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना जाहीर पाठिंबा दिला.