श्रीगोंदा, ता. ३० : तालुक्यातील ढोकराई वस्ती येथील नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या विमुक्त समाजातील कार्यकर्त्या लता उत्तम शिंदे यांना यंदाचा गंगाई बाबाजी आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे.
शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या गंगाई बाबाजी महोत्सवात आष्टी – पाटोदा – शिरूर चे मा. आ. व शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भीमरावजी धोंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनेत्री कल्याणी चौधरी व शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव डॉ. अजय दादा धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
लता उत्तम शिंदे या ग्रामीण विकास केंद्र जामखेड या संस्थेअंतर्गत विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी असून महिला समस्या निवारण केंद्राच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजातील महिलांचे प्रश्न सोडविण्याचे काम हाती घेतले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील विविध वस्त्या, गावे तसेच विशेषता लिंपणगाव व ढोकराई वस्तीवर त्यांनी भटक्या विमुक्त समाजातील महिलांचे अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच शिक्षण, आरोग्य, स्वच्छतागृह, रस्ते, पंतप्रधान आवास योजना असे अनेक प्रश्न सोडविले. भटके विमुक्त कुटुंबातील अनेक महिलांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचे दाखले, मतदान कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी नागरिकत्वाचे पुरावे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या माध्यमातून व शासकीय रुग्णालयाच्या मदतीने भटके मुक्त समाजातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र तपासणी शिबरे, गरोदर मातांची तपासणी, रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी अशी शिबिरे घेतली. त्यामुळे भटक्या मुक्त समाजातील महिलांना आपल्या आरोग्याविषयी जनजागृती निर्माण झाली. आणि अनेक महिलांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला. जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण, स्वावलंबीकरण, शिक्षण व प्रशिक्षण, स्वयंरोजगार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज अशा महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी त्याचबरोबर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, आदिवासी दिन, भटके विमुक्त दिन अशा प्रासंगिक कार्यक्रमानिमित्त महिलांचे मेळावे, प्रबोधन पर व्याख्याने, विविध स्पर्धा आयोजित करून त्यामध्ये महिलांना सहभागी करून घेतले. त्यामुळे भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या प्रगतीला हातभार लागला.
ग्रामीण विकास केंद्र आणि इकोनट या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता ठेवण्यासाठी परसबागासारखे उपक्रम त्यांनी राबविले. त्यामुळे महिलांना ताज्या पालेभाज्या मिळू लागल्या. भटके समाजातील कुटुंबामध्ये हिंसाचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी महिलांचा आधार गट त्यांनी तयार केला. अशा सक्षम आधार गटातून कौटुंबिक कलह मिटाविला. त्यासाठी गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्षांना त्या गटाशी जोडून घेऊन गावातील कौटुंबिक हिंसाचारावर नियंत्रण ठेवले.
भटके विमुक्त समाजातील महिलांसाठी ही एक रणनीती त्यांनी आखली. २०२० ते २५ या ५ वर्षाच्या कालावधीमध्ये भटक्या विमुक्त समाजातील नाथपंथी डवरी गोसावी समाजाने कात टाकली असून हा समाज आता विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. अशा पद्धतीचे काम गेल्या १५ वर्षापासून त्या करीत आहेत. त्यांच्या अलीकडच्याकाळात त्यांनी भटके मुक्तांच्या विविध मागण्यांसाठी सोलापूर ते मुंबई (मंत्रालय) भटके विमुक्त संवाद यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदविला. सध्या ढोकराई वस्ती येथील भटके विमुक्त कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेतील हक्काचे घरे मिळवून देण्यासाठी त्या लढा देत आहेत.
या कामासाठी त्यांना ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव, सचिव उमाताई जाधव, संचालक बापू ओहोळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.