श्रीगोंदा, दि. २५ मे २०२५ : श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी (पिंपळगाव पिसा) या गावात एका दुःखद प्रसंगी दशक्रिया विधीचा कार्यक्रम भर पावसात पार पडला. संत तुळशीदास महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराजवळील नदीपात्रात पारंपरिकरित्या होणाऱ्या या विधीसाठी कुठलाही शेड अथवा सभामंडप उपलब्ध नसल्याने नागरिक, पाहुणे मंडळी व राजकीय प्रतिनिधींना चिखलात व पावसात बसावे लागले.
या असुविधेमुळे कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या. पावसामुळे चिखलात अडकलेली व हलाखीची अवस्था झालेली वयोवृद्ध मंडळी, महिलावर्ग व लहान मुले – यामुळे वातावरण अधिकच हळहळजनक बनले होते. संततधार होणाऱ्या पावसात नागरिकांचे हाल पाहून गावकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
खरातवाडी गावाला १९९३ साली महसुली गावाचा दर्जा मिळूनही आजतागायत मूलभूत विकासाच्या सुविधा मिळालेल्या नाहीत. मंदिर परिसर व नदीपात्र हे धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानले जाते, मात्र त्या परिसरात कोणतीही संरचना नसल्याने दरवर्षी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात.
गावकऱ्यांच्या मते, “गावामध्ये विकासकामे केवळ कागदावरच झालेली आहेत. दशक्रिया विधीसारख्या महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमांसाठी किमान शेड, सभामंडप किंवा सांडपाण्याचा निचरा यांसारख्या सुविधा उभारल्या गेल्या पाहिजेत.”
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, प्रशासन व शासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून, भाविकांच्या व नागरिकांच्या श्रद्धेचा विचार करून तातडीने मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.