वांगदरी ग्रामपंचायतच्या प्रयत्नांना मिळाले मोठे यश; गावभर आनंदाचे वातावरण
श्रीगोंदा (ता. ३ जून) : वांगदरी ग्रामपंचायतीने उभारलेल्या ‘महाआवास घरकुल प्रकल्पास’ राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून, हा सन्मान बालेवाडी, पुणे येथील भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, मा. अजितदादा पवार, तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा प्रकल्प सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन मा. राजेंद्र दादा नागवडे आणि जिल्हा परिषद माजी सभापती, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाला आहे. तसेच वांगदरी गावचे तात्कालीन सरपंच आदेश नागवडे यांनी या घरकुल प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा करत प्रकल्प तडीस नेला. श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे, विस्तार अधिकारी मोशीन मालजपते, सरपंच संजय नागवडे आणि ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण मुरकुटे यांनी मिळून हा पुरस्कार स्वीकारला.
ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शासनाची ४० गुंठे जागा विशेष प्रयत्न करून हस्तांतरित करून घेतली आणि त्यावर दर्जेदार स्लॅबयुक्त ३६ घरांची निर्मिती केली. एकूण प्रकल्पासाठी १ कोटी २० लाख रुपये खर्च झाले असून, यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून आणि गवंडी प्रशिक्षण योजनेतून ८५ लाख, रेल फॉर फाउंडेशनतर्फे २२.५० लाख रुपये निधी प्राप्त झाला. उर्वरित रक्कम मा. राजेंद्र दादा नागवडे यांच्या माध्यमातून तसेच ग्रामपंचायतीच्या इतर निधीमधून उभी करण्यात आली.
या यशाबद्दल बोलताना सरपंच संजय नागवडे यांनी सांगितले की, “स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा घेऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली. आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.” हा पुरस्कार स्व. शिवाजीराव बापूंना समर्पित करताना त्यांनी संपूर्ण गावाच्या वतीने आनंद व्यक्त केला.
सदर प्रकल्पास यापूर्वी विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कारही मिळालेला आहे. आता राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याने वांगदरी गावाच्या वैभवात मोठी भर पडली असून, संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्व स्तरातून ग्रामपंचायतीचे व नागवडे कुटुंबियांचे अभिनंदन होत आहे.