श्रीगोंदा, दि. १० जून २०२५ : श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जोशी वस्तीवरील गट क्रमांक ५२/५२ या अतिक्रमित जागेवर गेल्या तीन दशकांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भटके विमुक्त समाजाच्या ३५० कुटुंबांना जागेचा कायदेशीर हक्क मिळावा, यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाला तहसीलदार मुदगुल यांनी लेखी आश्वासन देत उत्तर दिले असून, १२ जून रोजी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदक समितीची बैठक बोलावण्यात येणार आहे.
या बैठकीत गट क्र. ५२/५२ वरील जागा लाभार्थ्यांच्या नावे करण्याचा निर्णय होणार असून, जातीच्या दाखल्यांसाठी स्वतंत्र कॅम्प देखील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मान्यतेने १५ दिवसांत आयोजित करण्यात येणार आहेत, असेही सांगण्यात आले.
भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता. शेख महंमद महाराज मंदिरापासून ढोल-ताशा, डफ, हलगी, तुणतुणे अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादात मोर्चा निघाला आणि पोलीस स्टेशन मार्गे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ‘पाल ठोको आंदोलन’ करण्यात आले.
“जमीन आमच्या हक्काची”, “माणूस म्हणून जगण्याचा आमचा हक्क”, “लढा आमचा घरासाठी” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास भटक्या विमुक्त संयोजन समितीच्या सदस्या लता सावंत, पल्लवी शेलार, उमाताई जाधव, बापू ओहोळ, तुकाराम पवार, विशाल पवार, आसाराम काळे, संतोष चव्हाण, राहुल पवार, सचिन चव्हाण, आतिश पारवे, राजू शिंदे, ललिता पवार, रेशमा बागवान, शितल काळे, काजोरी पवार, डीसेना पवार, ऋषिकेश पवार, ऋषिकेश गायकवाड, अशोक मोरे, राजू भोसले, सागर शिंदे, संतोष पवार, मच्छिंद्र जाधव, राजू शिंदे, अविनाश काळे, ऋषिकेश गायकवाड यांच्यासह आदिवासी भटके विमुक्त समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीराताई शिंदे, तालुका प्रमुख नंदू गाडे, तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू ओहोळ यांनी केले, सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी तर आभार पल्लवी शेलार यांनी मानले. आदिवासी भटके मुक्तांच्या संयोजन समितीच्या सदस्य लता सावंत, पारधी विकास कृती समितीचे सदस्य तुकाराम पवार, अनिल घनवट, रूपचंद सावंत, संजय सावंत,अरविंद कापसे, मिराताई शिंदे यांची भाषणे झाली. भाषणांमधून शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मागणी मांडण्यात आली. हा लढा हा केवळ जमिनीचा नसून माणूस म्हणून जगण्यासाठीचा आहे, हे या आंदोलनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले.