महादजी शिंदे विद्यालयात शाहू महाराजांवर एकांकिका सादर; विचारांचा जागर
श्रीगोंदा, दि. २८ जून २०२५ : “छत्रपती शाहू महाराज हे बहुजन समाजासाठी प्रेरणास्थान होते. त्यांनी शिक्षण, संस्कार, धर्म आणि राजसत्ता यांचा उपयोग करून समाजातील विषमता, अज्ञान, जातीयतेचा नाश केला. त्यांच्या विचारांचा वारसा आजच्या सत्ताधाऱ्यांनी आत्मसात करावा,” असे प्रतिपादन निखिल कवडे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी बोलताना कवडे म्हणाले, “शाहू महाराजांनी महात्मा फुलेंनी रुजवलेला सत्यशोधक विचार आयुष्यभर जपला. समाजसुधारणेची खरी तळमळ काय असते, हे त्यांनी कृतीतून दाखवले. आजच्या काळातील राजकीय नेत्यांनीही त्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित एक भावस्पर्शी नाटिका सादर केली. या एकांकिकेत शिवमराजे वागस्कर, शिवम घाडगे, विराट पवार, प्रथमेश गायकवाड यांनी प्रभावी अभिनय साकारला.
विद्यार्थ्यांच्या मनोगतात निशांत धोंडे, कार्तिक जगताप व मयूर पेडगावकर यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिलीप भुजबळ होते. यावेळी उपप्राचार्य शहाजी एकाड, पर्यवेक्षक सुनिता काकडे, जेष्ठ शिक्षक विलास दरेकर, सचिन झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव हिरडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभिजीत चव्हाण यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख कैलास उकिरडे यांनी केले.
- ज्येष्ठ नागरिकांचे योगदान
शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेल्या म्हातारपिंपरी गावचे ज्येष्ठ नागरिक दादासाहेब शिरवाळे यांनी स्वयंस्फूर्तीने विद्यालयाच्या बहुउद्देशीय हॉलसाठी ११ हजार रुपयांची देणगी जाहीर करून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.